वंदेभारत एक्सप्रेसमधील दह्यात सापडल्या अळ्या, आयआरसीटीसी आणि संबंधित कॅटरर्सवर रेल्वेची कठोर कारवाई

वंदेभारत सारख्या आलिशान एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या दह्यात अळ्यासापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशाने या संदर्भात समाजमाध्यमात पोस्ट टाकल्यानंतर रेल्वेने आता कठोर कारवाई केली आहे.

वंदेभारत एक्सप्रेसमधील दह्यात सापडल्या अळ्या, आयआरसीटीसी आणि संबंधित कॅटरर्सवर रेल्वेची कठोर कारवाई
vande bharat express
| Updated on: Mar 26, 2026 | 4:20 PM

भारतीय रेल्वेने प्रवाशांना आरामदायी सफर घडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी वंदेभारत एक्सप्रेस सुरु केली. या वंदेभारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदेभारतचे तिकीट इतर ट्रेनपेक्षा जादा आहे. त्यामुळे या आलिशान वंदेभारत एक्सप्रेसमध्ये चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळण्याची अपेक्षा असताना घडताना मात्र विचित्र दिसत आहे. आता वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना पुरवण्यात आलेल्या दह्यात अळ्या सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची दखल भारतीय रेल्वेने घेतली आहे. काय नेमके प्रकरण हे पाहूयात…..

वंदेभारत ट्रेनमध्ये प्रवाशांना पुरवलेल्या पदार्थांपैकी बंद पाकिटातील दह्यात अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर प्रवाशांनी या संदर्भात तक्रार केली आहे. त्यानंतर समाजमाध्यमावर देखील या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असून कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात रेल्वेने आयआरसीटीसीवर १० लाख रुपयांचा आणि कॅटरिंग कंपनीवर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पाटणा ते टाटानगर जात असलेल्या वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलेल्या दह्यात अळ्या सापडल्याच्या घटना घडल्यानंतर या प्रवाशाने सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात पहाता येईल की डिनरसाठी दिलेल्या जेवणातील दह्यात अळ्या वळवळताना दिसत आहेत. या व्हिडीओत प्रवाशाने हा देखील दावा केला की अन्य प्रवाशांना दिलेल्या दह्यातही अळ्या वळवळताना दिसत आहे.

या संदर्भात तक्रार मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वेचे खानपान व्यवस्था सांभाळणारी यंत्रणा आयआरसीटीसीने संबंधित अन्न पुरवणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करत तिच्यावर ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.तसेच आयआरसीटीसीला देखील १० लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.

येथे पोस्ट पाहा –

दह्यात सापडल्या अळ्यांचा व्हिडीओ –

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की १५ मार्च २०२६ च्या ट्रेन क्रमांक २१८९६ ( पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस ) मध्ये अन्नपदार्थांच्या गुणवत्ते संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कारवाई अंतर्गत आयआरसीटीसीवर १० लाख रुपये दंड आणि कॅटरर्सवर ५० लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. तसेच त्याचे कंत्राट रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की या प्रकरणाला गंभीरपणे घेण्यात आले आहे. सेवेची गुणवत्ता कायम ठेवणे आमची प्राथमिकता आहे. त्यांनी सांगितले की खासकरुन वंदेभारत सारख्या प्रिमियम ट्रेनमध्ये उच्च दर्जेची सेवा आणि स्वच्छते संदर्भात कठोर नियम लागू आहेत. कारण ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी चांगल्या सुविधेची अपेक्षा करतात.

 

Follow Us