Goa Assembly Election 2022 | नेते महाराष्ट्रातले, स्पर्धा गोव्याची! जुगलबंदी रंगली फडणवीस विरुद्ध राऊत वक्तव्यांची

| Updated on: Jan 12, 2022 | 11:11 PM

Raut vs Fadnavis : निवडणूक तशी गोवा विधानसभेची आहे. मात्र शाब्दिक चकमक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊतांमध्ये सुरु झालीय.

Goa Assembly Election 2022 | नेते महाराष्ट्रातले, स्पर्धा गोव्याची! जुगलबंदी रंगली फडणवीस विरुद्ध राऊत वक्तव्यांची
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

पणजी : संजय राऊत (Sanjay Raut) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा जुंपलीय. यावेळी निमित्त आहे, गोवातल्या विधानसभा निवडणुकीचं! फडणवीस गोव्यात पैशांचा पाऊस पाडत असले, तरी पुरुन उरणार, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना खुलं आव्हान दिलंय. गोव्यातल्या निवडणुकीवरुन राऊत विरुद्ध फडणवीस अशी जुगलबंदी रंगली आहे. निवडणूक तशी गोवा विधानसभेची आहे. मात्र शाब्दिक चकमक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊतांमध्ये सुरु झालीय. गोव्यात भाजपकडून पैशांचा पाऊस पाडण्यात येत असून फडणवीसांच्या पैशांना पुरुन उरणार, असं आव्हान राऊतांनी फडणवीसांना दिलंय. नोटापेक्षा अधिक मतं मिळवण्यासाठी राऊतांची लढाई सुरु आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणीसांनी केलं होतं. त्यावर संजय राऊतांनी आपल्या स्टाईलमध्ये फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गोवा विधानसभेच्या (Goa Assembly elections 2022) निवडणुकीवरुन सुरु झालेली ही राजकीय वक्तव्यांची जुगलबंदी चांगलीच रंगात आली आहे.

राजकारण जोमात!

व्हॅलेन्टाईन डेला गोवा विधानसभा निवडणुकांसाठी मतदार पार पडणार आहे. एकाच टप्प्यात गोव्यातील चाळीस मतदारासंघांसाठी मतदार पार पडणार आहे. आचारसंहिता आधीच लागूही झाली आहे. अशातच आता राजकीय जुगलबंदीही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

निवडणूक गोव्याची, कलगीतुरा राज्यातील नेत्यांमध्ये

राऊत आणि फडणवीस आमनेसामने का येत आहेत,? तर त्याचं कारण आहे, गोव्यातली भाजपची जबाबदारी फडणवीसांकडे देण्यात आलीय. फडणवीसांना निवडणूक प्रभारी करण्यात आलंय. तर शिवसेनेला गोव्यात बळ देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राऊतांना पुढं केलंय. त्यातच गोव्यातील भाजपचे मंत्री मायकल लोबोंनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर भाजपचे आणखी एक आमदार प्रवीण झाटये यांनीही सोडचिठ्ठी दिलीय. त्यावरुनही राऊतांनी फडणवीसांना चिमटा काढलाय. फडणवीस गोव्यात गेले आणि पक्ष फुटला अशी टीका राऊतांनी केलीय.

दरम्यान, नाकापेक्षा मोती जड झालेल्या मायकल लोबोंना श्रीपाद नाईकांनीही निशाणा साधाला. पक्षानं योग्य वेळी त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे लोबोंनी विश्वासघात केल्याचं श्रीपाद नाईक म्हणालेत. तर फडणवीसांनी काही अपवाद सोडले तर ज्यांना तिकीट मिळणार नाही, अशी खात्री होती, तेच लोक पक्ष सोडून जात असल्याचं म्हटलंय.

राऊत आणि फडणवीसांच्या या वादात, आशिष शेलारांनीही उडी घेतलीय. शिवसेना आणि गोव्याचा काय संबंध? असा सवाल करुन राऊतांना कोणी गांभीर्यानं घेत नाही, असं शेलार म्हणालेत. गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत असली..तरी शिवसेना खातं उघडण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र काँग्रेस स्वबळावर लढतेय. त्यामुळं शिवसेना मित्रपक्षांच्या शोधात आहे…म्हणजेच मुख्य लढाई भाजपशीच असल्यानं गोव्यावरुन राऊत आणि फडणवीस आमनेसामने आलेत.

संबंधित बातम्या –

गोव्यातील पैशाचा पाऊस कुणाचा? आप आणि टीएमसीच्या पैशांचा धनी कोण? संजय राऊतांचा सवाल

Pramod Sawant : गोव्यात भाजपचं सरकार येणार; संजय राऊत राज्यात का येतात? त्यांचा इथं एक सरपंचही नाही, प्रमोद सावंत यांनी डिवचलं