
26 नोव्हेंबर 2021 म्हणजेच आज मुंबईतील भीषण हल्ल्याला 13 वर्षे पूर्ण होत आहेत. आजचाच दिवस होता, जेव्हा लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानातील जिहादी संघटनेच्या 10 जणांनी मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ला केला आणि त्या पुढील 4 दिवसांत आणखी 12 हल्ले केले. ताजमहाल पॅलेस हॉटेल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस यासह इतर ठिकाणांवरील हल्ल्यांमध्ये 15 देशांतील 166 लोक मारले गेले.

यादिवशी मुंबई जवळपास साठ तास ओलिस बनली होती. मुंबई हल्ल्याची आठवण झाली की, आजही लोकांचे मन हेलावून जाते. मुंबई हल्ल्याच्या तपासातून जे काही समोर आले आहे त्यावरून असे दिसून येते की कराचीहून बोटीतून 10 हल्लेखोर मुंबईत दाखल झाले होते. या बोटीवर चार भारतीय होते, ते किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. रात्री आठच्या सुमारास हे हल्लेखोर कुलाब्याजवळील कफ परेडच्या मासळी मार्केटमध्ये उतरले. तिथून ते चार गटात विभागले आणि टॅक्सी घेऊन आपापल्या ठिकाणाकडे निघाले. या लोकांच्या हालचाली पाहून काही मच्छिमारांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांनाही कळवले.

रात्री 9.30 च्या सुमारास मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर गोळीबार झाल्याची बातमी आली. मुंबईतील या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाच्या मुख्य हॉलमध्ये दोन हल्लेखोर घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यापैकी एक मोहम्मद अजमल कसाब होता, ज्याला आता फाशी देण्यात आली. हल्ला झाला तेव्हा ताजमध्ये 450 आणि ओबेरॉय येथे 380 पाहुणे होते. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 27 नोव्हेंबरला ताजमधून सर्व ओलीस सोडण्यात आल्याची बातमी आली होती. पण जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसतसे हल्लेखोरांनी अजून काही लोकांना ओलीस ठेवले आहेत, ज्यात अनेक परदेशी लोक असल्याचे कळले. हल्ल्यादरम्यान, दोन्ही हॉटेल्स रॅपिड अॅक्शन फोर्ड (RPF), मरीन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडोनी घेरले होते.

दुसरीकडे, मुंबईतील ज्यूंचे मुख्य केंद्र असलेल्या नरिमन पॉइंटवरही दोन हल्लेखोरांनी ताबा मिळवला होता. अनेकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर एनएसजी कमांडोंनी नरिमन हाऊसवर छापा टाकला आणि तासाभराच्या लढाईनंतर हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. पण, एनएसजीच्या एका कमांडोलाही आपला जीव गमवावा लागला. हल्लेखोरांनी रब्बी गॅब्रिएल होल्ट्जबर्ग आणि त्यांची सहा महिन्यांची गर्भवती पत्नी रिव्काह होल्ट्जबर्ग यांच्यासह अनेकांना आधीच ठार मारले होते. त्यानंतर सुरक्षा दलांना तेथून एकूण सहा ओलिसांचे मृतदेह सापडले.

29 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत नऊ हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला, तेव्हा 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अजमल कसाबच्या रूपात एक हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडला होता. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात होती. मात्र 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तीन दिवस सुरक्षा दल दहशतवाद्यांशी झुंज देत होते. यादरम्यान अनेक स्फोट झाले, जाळपोळ झाली, गोळीबार झाला आणि ओलिसांच्या सुटकेच्या आशा पल्लवित होत राहिल्या आणि भारतातीलच नव्हे तर जगभरातील 1.25 अब्ज लोकांच्या नजरा ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसवर खिळल्या होत्या.