
हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्यांना नेहमीच विशेष महत्त्व राहिले आहे. पूर्वीच्या काळात चित्रपटांमध्ये एक-दोन नाही तर अनेक गाणी असायची आणि त्यातील बहुतांश गाणी लोकांची आवडती बनायची. चित्रपट हिट असो वा फ्लॉप पण त्याची गाणी मात्र हमखास सुपरहिट होत असत.

अशाच एका चित्रपटाने जवळपास 37 वर्षांपूर्वी गाण्यांच्या बाबतीत वेगळाच इतिहास रचला होता. 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'चांदनी' या चित्रपटाने संगीताच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटात तब्बल 11 गाणी होती आणि विशेष म्हणजे सर्वच गाणी प्रेक्षकांची आवडती ठरली.

त्या काळात गाणी ही फक्त मनोरंजनाचा भाग नव्हती तर लोकांच्या भावनांशी जोडलेली असायची. रेडिओ, कॅसेट्स, लग्नसमारंभ किंवा प्रवास या सर्व ठिकाणी ही गाणी ऐकायला मिळायची. 80 आणि 90 च्या दशकात चित्रपटांची ओळखच त्यांच्या संगीतामुळे ठरत असे.

चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियां हैं’, ‘मैं ससुराल नहीं जाऊंगी’ आणि ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ यांसारखी गाणी आजही लोकांच्या आवडीची आहेत. या गाण्यांमधील धून, शब्द आणि सादरीकरणामुळे ती अजरामर ठरली आहेत.

3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात जवळपास 12 ते 15 कोटी रुपयांची कमाई करत मोठे यश मिळवले. ‘चांदनी’ हा केवळ एक चित्रपट नसून हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताचा सुवर्णकाळ दर्शवणारा एक अजरामर चित्रपट आहे.