
भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे. रेल्वेतून दररोज 2 ते 2.5 कोटी जण प्रवास करतात. एक्स्प्रेस, सुपरफास्ट, मेल... सर्व श्रेणीच्या गाड्या भारतीय रेल्वेचा भाग आहेत. पण आता विशेष ट्रेन तयार होत आहे. देशातील ही पहिली ट्रेन हवाशी बोलणार आहे. त्यामुळे तिला नाव एअर ट्रेन ठेवले आहे.

भारतात धावणारी ही एअर ट्रेन स्पेशल ट्रेन असणार आहे. ही पूर्णपणे स्वयंचलित प्रणालीवर काम करणार आहे. न थांबता ही ट्रेन चालत राहणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून दिल्ली विमानतळावरील कनेक्टिव्हीटी चांगली करण्यात येणार आहे. दिल्ली विमानतळाचे विविध टर्मिनल या ट्रेनने जोडण्यात येणार आहे.

दिल्ली विमानतळावरील एक, दोन अन् तीन टर्मिनलमधील अंतर 7.5 किलोमीटर आहे. ते अंतर ही ट्रेन कव्हर करणार आहे. या ट्रेनच्या प्रकल्पाचे काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पावर दोन हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

एअर ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागणार नाही. दिल्ली विमानतळावरुन सध्या दरवर्षी सात कोटी लोक प्रवास करतात. पुढील सहा ते सात वर्षांत ही संख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे विमानतळावरील कनेक्टीव्हीटी अधिक मजबूत करण्यासाठी एअर ट्रेनची गरज वाटत होती.

सध्या एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जाण्यासाठी प्रवाशांना डीटीसी शटल बसने जावे लागते. ही एअर ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे. एवढेच नाही तर एअर ट्रेन सुरू झाल्यानंतर विमानतळावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार आहे.