Ajit Agarkar : रोहित शर्माच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आगरकरांना महागात पडलं? BCCIपासून दुराव्याची 5 कारणं
Ajit Agarkar Exit Reasons : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमधील अंतर्गत वाद सातत्याने चर्चेत होते. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे, पण त्यांना या पदावरुन पायउतार होण्यामागची काही कारणं चर्चिली जात आहेत. कोणती आहेत ही कारणं, ज्यामुळे आगरकरांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता संपल्यात जमा आहे.

माजी कर्णधार रोहित शर्माच्या भवितव्यावरून झालेला वाद आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत वाढलेले मतभेद, ही मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआय यांच्यातील संबंध बिघडण्याची प्रमुख कारणे ठरल्याचं मानलं जातंय.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील भारताच्या खराब कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बोलावण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे आगरकर यांनी पाठ फिरवली. निवड समिती अध्यक्षांच्या या अनुपस्थितीमुळे बीसीसीआयमधील एक गट तीव्र नाराज झाला होता.
२०२७ च्या विश्वचषकासाठी यशस्वी जयस्वालला संधी देण्याच्या उद्देशाने निवड समितीला लॉर्ड्स वनडेनंतर रोहित शर्माला एकदिवसीय संघातून निरोप द्यायचा होता. मात्र, रोहितने बोर्डाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर, बीसीसीआयने आगरकरांना पूर्वकल्पना न देता रोहितच्या निवृत्तीच्या बातम्या फेटाळून लावल्या, ज्यामुळे आगरकर दुखावले गेले.
भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार खेळाडूंच्या निवृत्तीचा किंवा भवितव्याचा अंतिम निर्णय कोणी घ्यायचा, यावरूनही वाद होता. आगरकर यांच्या मते हा अधिकार पूर्णपणे निवड समितीचा आहे, तर बीसीसीआय प्रशासनाने परंपरेनुसार या निर्णयात हस्तक्षेप करत रोहितची पाठराखण केली.
आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या स्पर्धांसाठी संघ निवड, भारत 'अ' संघाचे देशांतर्गत स्पर्धांशी क्लॅश होणारे वेळापत्रक आणि तसेच दुखापतग्रस्त खेळाडूंचे व्यवस्थापन या धोरणात्मक मुद्द्यांवरून आगरकर आणि लक्ष्मण यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते.