
कलाकारांच्या जीवनात काही अडचणी नसतील. त्यांचं जीवन प्रचंड सुखकर असेल, असं प्रेक्षकांना वाटतं. मात्र कलाकार पडद्यामागे प्रचंड मेहनत घेत असतात. अभिनेत्री माधवी निमकर हिने तिच्या संघर्षकाळावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकरने तिच्या जीवनातील संघर्ष सांगितला आहे. मी नववीत असल्यापासून मला जेवण बनवता येतं. माझ्या बाबांकडे 11 नोकरी नव्हती. त्यांची कंपनीच बंद झाली होती. त्यांचं हातचं काम गेल्यानंतर समोर सगळा अंधार होता, असं माधवी म्हणाली.

बाबांचा जॉब गेल्यानंतर आम्ही लोणचं आणि पोळी असं खात होतो. आई म्हणायची की कडधान्ये आहेत, ती जपून वापरूया... आम्ही कमी कडधान्ये शिजवायचो. त्यात पाणी जास्त टाकायचो आणि रस्सा भाजी आम्ही खायचो, असं माधवी म्हणाली.

बाबांची कंपनी पुन्हा सुरू होणार आहे की नाही, हे माहिती नव्हतं. त्यामुळे आई म्हणाली की, मी नोकरी करते. तेव्हा मग आई नोकरी करू लागली. तेव्हा तिने मला स्वयंपाक शिकवला. आधी कुकर लावणं, भाजी करणं हे मी शिकले. नंतर चपाती बनवायला येऊ लागली. तो काळ प्रचंड कठीण होता, असं माधवीने सांगितलं.

माधवी निमकर ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. असा मी तसा मी, हम तो तेरे आशिक है, धावाधाव, पावनखिंड या सिनेमांमध्ये काम केलंय. तर सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाहवरील मालिकेत माधवी सध्या काम करते आहे.