
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा टाळ-मृदंगाच्या गजरात रविवारी दिवे घाटात पोहचला. ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात संपूर्ण दिवे घाट मार्ग दुमदुमून गेला. पालखीसोबत दिवे घाट पार करणे वारकऱ्यांसाठी मोठ्या कसरत असते.

चढ-उतारांनी भरलेला, नागमोडी वळणांचा आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला दिवे घाट हा या सोहळ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या ठिकाणी वारीचे वारीचे विहंगम दृश्य दिसते. लाखो वारकरी आज दिवे घाटाचा अवघड मार्ग सर करत सासवडकडे जात आहे.

अनेक जण पालखीचे विहंगम, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी तसेच कॅमेरात टिपण्यासाठी टेकडीवर जातात. मात्र, यंदा दिवे घाटातील टेकडी परिसरात नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. घाटाचे रुंदीकरणाचे काम चालू असल्याने अनेक ठिकाणी डोंगर फोडण्यात आले आहे. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून यंदा टेकडी जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव केला आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी दिवेघाट पालखी मार्गावर एनडीआरएफचे जवान तैनात केले आहे. कुठल्याही आपत्तीजनक परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी दिवेघाटमार्गावर एनडीआरएफच्या 2 तुकडया तैनात केल्या.

माऊलींच्या पालखी मार्गावरील अवघड दिवे घाट मार्गावर वारकऱ्यांना जलद उपचार मिळावेत यासाठी बाईक ॲम्बुलन्सची सुविधा करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या गर्दीतून चार चाकी रुग्णवाहिका त्वरित रुग्णापर्यंत पोहोचवणे अवघड असल्याने या बाईक ॲम्बुलन्सद्वारे सेवा पुरवण्यात येतील.