
2013 मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील जब्या- शालू यांचीदेखील खूप चर्चा झाली. राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तीच शालू आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

शालूची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातने नुकतंच धर्मांतर केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

'कारण तुमच्यासाठी माझ्या योजना मला माहीत आहेत, असं परमेश्वर म्हणतो,' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंमध्ये राजेश्वरीसोबत तिच्या कुटुंबीयांनीही धर्मांतर केल्याचं पहायला मिळतंय.

राजेश्वरीसह तिच्या कुटुंबीयांनीही पांढरे कपडे परिधान करत ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. रविवारी 'ईस्टर संडे' होता, त्यानंतर राजेश्वरीची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

काहींनी राजेश्वरीचा धर्मांतराचा निर्णय वैयक्तिक असल्याचं म्हटलंय. तर काहींनी त्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. 'खूप वाईट वाटलं' अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.