बैलजोडीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या मुलांनी औत ओढले, कुटुंबाचा परिस्थितीशी संघर्ष
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून मन हेलावून टाकणारे वास्तव समोर आले आहे. आर्थिक अडचणी, वाढलेला शेती खर्च आणि बैलजोडी घेण्याची क्षमता नसल्याने एका शेतकऱ्याने आपल्या दोन मुलांच्या मदतीने शेत नांगरण्याचा तळपत्या उन्हात राबून शेत नांगरल्याची घटना घडली आहे.

पाचोरा तालुक्यातील कुन्हाड खुर्द येथील ज्ञानेश्वर शहाणे यांच्या मुलांनी औताला जुंपून तब्बल चार एकर शेतात कपाशीच्या पिकासाठी सऱ्या पाडल्या.शेतीसमोरील आर्थिक संकट किती गंभीर आहे, याचे हे विदारक वास्तव समोर आले आहे.

निसर्गाची अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक चणचण यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पाचोरा तालुक्यातील कुन्हाड खुर्द येथील शेतकरी ज्ञानेश्वर शहाणे यांनी दुसऱ्याची शेती कसण्यासाठी घेतली होती. मात्र बैलजोडी खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने आणण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने त्यांनी हा मार्ग निवडला.

वडिलांची अडचणी ओळखून गणेश आणि विनेश या दोन्ही मुलांनी स्वतःच औत ओढण्याची जबाबदारी स्वीकारली. बाप-लेकांनी मिळून दिवसभर मेहनत घेत चार एकर क्षेत्रात कपाशी पेरणीपूर्व मशागतीचे काम पूर्ण केले. या घटनेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या संघर्षाची आणि परिस्थितीशी दोन हात करण्याच्या जिद्दीची प्रचिती दिली आहे.

बाजारात बैलजोडीची किंमत ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे शहाणे सांगतात. आर्थिक परिस्थितीमुळे हा खर्च करणे शक्य नसल्याने मुलांच्या मदतीने औत ओढण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील पाचारो तालुक्यातील ही घटना केवळ एका शेतकरी कुटुंबाची कथा नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक वास्तवाचे बोलके चित्र असल्याची चर्चा होत आहे.