
यंत्राच्या सहाय्याने शेती कामे : मजुरांची टंचाई आणि वेळेची बचत व्हावी म्हणून शेतीकामात यंत्राचा वापर वाढला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या मळणीची कामे ही यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. यामुळे धान्याची नासाडीही होत नाही. शिवाय अधिकचा खर्च टळला जात आहे.

वाढत्या उन्हामध्ये रब्बीची कामे: आतापर्यंत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. पण गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे रब्बीतील कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी पिकांचे उत्पन्न वाढेल असा आशावाद आहे.

करडई उत्पादनात घट : करडईवर जानेवारी महिन्यात चिकटा मावा आणि खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने करडईच्या उत्पन्नात घट आलीय. सध्या करडई पिकाला बाजारात चांगला भाव असल्याने बळीराजा तळपत्या उन्हात करडईची काढणी करतोय.

करडई होते मुख्य पीक : मराठवाड्यातील बहुतांश भागात अगदी 2000 साला पर्यंत उडीद, मुंग, ज्वारी, कापूस, हरभरा आणि करडई हे प्रमुख पिके होती. उन्हाळी हंगामात करडई ने शेत शिवार बहरून गेलेले दिसत असे, मात्र रासायनिक खतांच्या माऱ्याने जमिनीचा पोत बिघडला आणि करडईचे उत्पन्न घटत गेले. त्यामुळे गेल्या 20 वर्षात करडईचे पीक हे दुर्मिळ बनत गेलय. मात्र आता पुन्हा शेतकरी ह्या जुन्या पिकाकडे वळताना दिसतायत.