लग्नावर लग्न, हे आमच्या समाजात..; आमिर खानबद्दल हिना खान स्पष्टच बोलली
अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर हिना खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. रुबीना दिलैकच्या चॅट शोमध्ये हिनाने आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल तिचं मत व्यक्त केलं. यावरून तिलासुद्धा ट्रोल केलं जातंय.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने 5 जुलै 2026 रोजी वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. गौरी स्प्रॅटशी आमिरने तिसरं लग्न केलं असून यावरून त्याला बरंच ट्रोलसुद्धा करण्यात येतंय. आमिरवर 'लव्ह जिहाद'चेही आरोप करण्यात आले आहेत. आता प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री हिना खानने आमिरच्या तिसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री रुबीना दिलैकच्या चॅट शोमध्ये हिना खानला प्रश्न विचारण्यात आला की, "एखाद्या सुपरस्टारच्या खासगी आयुष्याचा त्याच्या व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होतो का?" त्यावर हिना नकारार्थी उत्तर देत म्हणते, "त्या हिशोबाने मग आमिर खानचे कोणतेच चित्रपट चालायला पाहिजे नव्हते."

यावेळी रुबीना म्हणते की आमिर त्याच्या आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या वादात अडकला नाही. तेव्हा हिना त्याच्या तिसऱ्या लग्नाचा उल्लेख करत म्हणते, "हा काही कमी वादग्रस्त विषय आहे का? सामान्य लोक तर असाच विचार करतील की, हा काय करतोय? हिलासुद्धा सोडलं का?"

हिनाचं वक्तव्य ऐकून रुबीना तिला म्हणते, "आपण एखाद्याच्या खासगी आयुष्याबद्दल मत बनवत आहोत. त्याने इतके ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तरीही लोक त्याच्या कर्तृत्वाऐवजी लग्नावर लक्ष केंद्रीत करत आहेत." हे ऐकून हिनाने स्पष्ट केलं की ती आमिरबद्दल मत बनवत नाहीये. तरी तिने पुढे म्हटलंय, "हे आमच्या समाजात चांगलं मानत नाहीत."

"लग्नानंतर लग्न.. हे आमच्या समाजात चांगलं मानलं जात नाही", असं मत हिना व्यक्त करते. तेव्हा तिचा पती रॉकी जयस्वाल म्हणतो, "लग्न सोडा, घटस्फोटसुद्धा चांगलं मानलं जात नाही." हिनाचा हा एपिसोड सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही नेटकरी तिच्यावर टीकासुद्धा करत आहेत.