
अनेकदा आपल्या घरात, आजूबाजूच्या परिसरामध्ये साप आढळून येतात. साप हे नाव ऐकताच आपल्याला धडकी भरते. नुसता साप दिसला तरी देखील आपली भितीनं गाळण उडते. मात्र अशा स्थितीमध्ये न भिता त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना देणं अपेक्षित आहे.

भारतात अनेक जातींचे अनेक प्रकारचे साप आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याईतकेच साप हे विषारी आहेत. त्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग या बिग फोर सापांचा समावेश होतो.

अनेकदा आपण भीतीपोटी बिनविषारी सापाला देखील मारून टाकतो. त्यामुळे सापाच्या अनेक दुर्मिळ जाती या झपाट्यानं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आज त्यांच्या संवर्धनाची गरज आहे.

सापांबद्दल प्रत्येक व्यक्तिलाच शास्त्रीय माहिती असते असं नाही, त्यामुळे अनेकदा गौरसमजातून आपण साप दिसला की त्याला भीतीपोटी मारून टाकतो. मात्र साप विषारी असो किंवा बिनविषारी त्याला न मारता सर्पमित्रांच्या मदतीनं पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावे.

आज आपण माहिती घेणार आहोत विषारी आणि बिनविषारी साप यातील मुख्य फरक कसा ओळखायचा. भारतामध्ये सर्वात विषारी जो साप आढळतो त्याचं नाव इंडियन कोब्रा आहे. तो हल्ला करताना फणी काढतो त्यामुळे तो सहज ओळखू येतो. तसेच नागाप्रमाणेच मण्यार, फुरसे, घोणस हे आणखी तीन साप विषारी आहेत. ते त्यांचं वजन आणि आकारावरून थोडासा अभ्यास केला तर तुम्ही सहज ओळखू शकता.

हा जसा फरक आहे तसाच आणखी एक मोठा फरक विषारी आणि बिनविषारी सापांमध्ये असतो. तो म्हणजे जे विषारी साप असतात त्यांच्या शरिराच्या खालचा भाग हा पूर्णपणे पांढराशुभ्र असतो. तर जे बिनविषारी साप असतात त्यांच्या शरिराच्या खालाच भाग हा पिवळसर पांढरा असतो. या फरकावरून तुम्ही सापला ओळखू शकतात.

मात्र कोणत्याही प्रकारचा साप असेल तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, ही माहिती केवळ तुमच्या ज्ञानासाठी देण्यात आली आहे. साप आढळल्यास त्याची माहिती तातडीनं तुमच्या परिसरात असणाऱ्या सर्पमित्रांना द्या. कुठलंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता सापाला पकडणे तुमच्या जिवावर देखील बेतू शकते.