
वाशीमच्या रिसोड तालुक्यातील अगरवाडी येथील शेतकऱ्यांसमोर हुमणी अळीचे नवीन संकट उभे राहिले आहे. त्यामुळे परिसरातील 300 एकर शेती धोक्यात आली असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने सोयाबीन आणि हळद पिकावर पाहायला मिळतो. हुमणी अळी जमिनीत राहत असून पिकांची मुळं खाते त्यामुळे झाडं सुकली जावून मरतात.

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटं वाढतंच चालली आहेत. यावर्षी उशिरा आलेला पाऊस, त्यात दुबार पेरणीचे संकट, पुरात वाहून गेलेली शेती आणि आता पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेती संकटात सापडला आहे.

रिसोड तालुक्यातील अगरवाडी परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हुमणी अळी ही जमिनीखाली राहत असल्याने त्यांना नियंत्रण करणे अधिक अवघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांनी विविध बँकांचे कर्ज घेऊन पेरणी केली, पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ सगळ्या शेतकऱ्यांवर आली आहे. इतर आपत्तीप्रमाणे याचे पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.