
हिरवे वाटाणे किंवा मटार ही अशी भाजी आहे ज्याची चव लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. थंडीच्या दिवसात मुबलक येणारी ही भाजी सर्वांना खायला आवडते. मटार हे जीवनसत्त्वं आणि अमीनो ॲसिडने समृद्ध असतात. पण याच भाजीचे सेवन काही लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

युरिक ॲसिड : हा आपल्या शरीरात असा एक द्रव आहे, ज्याची पातळी वाढल्यास सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. मटारामध्ये अमीनो ॲसिड, व्हिटॅमिन डी, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात जे यूरिक ॲसिड वाढवतात. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी मटार कमी खावेत.

वजन वाढते : मटारामध्ये प्रोटीन्स व कार्ब्स दोन्ही योग्य प्रमाणात असतात. जर तुम्ही मटारचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे चविष्ट खाण्याच्या नादात शरीरात समस्या निर्माण करणे टाळा.

किडनीच्या रुग्णांनी रहावे दूर : किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतो. एका अहवालानुसार, जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्याने किडनी कमकुवत होऊ शकते. मटारामध्ये प्रोटीन्स जास्त असतात. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी या भाजीपासून लांबच रहावे.

गॅस्ट्रिक प्रॉब्लेम : जर एखाद्या व्यक्तीला वारंवार गॅसेस आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर त्यांनी मटार कमीच खावेत. मटाराची भाजी किंवा मटाराचे इतर पदार्थ रात्रीच्या वेळेस खाणे टाळावे, कारण ते पचायला जड असतात.