
आयएमडीकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्ली आणि परिसरात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो असं आयएमडीनं म्हटलं आहे.

दिल्लीसह एनसीआरमध्ये मगील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सकाळी -सकाळी ढगाळ वातावरणाची निर्मिती होत आहे, त्यामुळे तापमानात देखील घट झाली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नुसताच पाऊस पडणार नसून, सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.

27-28 फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

एक मार्चापासून मात्र हळू -हळू देशातील अनेक राज्यांमधील तापमान वाढेल, असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास दरवर्षी एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यात जाणवणारा असाह्य उकाडा आणि उन्हाच्या झळा फेब्रुवारी महिन्यात मुंबईकरांना जाणवायला लागल्या आहेत.

मुंबई आणि कोकणात प्रचंड उकडा वाढला असून, नागरिक गरमीनं हैरान झाले आहेत. इतर भागात देखील उन्हाचा कडका वाढला आहे.