
बांगलादेशमध्ये जेव्हापासून सत्ताबदल झालेला आहे, तेव्हापासून त्या देशाची पाकिस्तानसोतबची जवळीक वाढली आहे. तर दुसरीकडे बांगलादेश आणि भारत यांच्यात मात्र काहीसा दुरावा निर्माण झालेला आहे. असे असतानाच आता बांगलादेशातील एक मासा भारत-बांगलादेश यांच्यात जवळीक निर्माण करण्यास मदत करणार का? असे विचारले जात आहे.

सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात सीमेवर सध्या तणाव आहे. बांगलादेशातून भारतात होणारी अवैध घुसखोरी याविरोधात भारताने कडक धोरण अवलंबलेले आहे. त्यामुळे अनेक अवैध नागरिकांना भारत-बांगलादेशच्या सीमेवरून परत बांगलादेशमध्ये ढकलले जात आहे. भारताच्या या धोरणावर बांगलादेशने नाराजी व्यक्त केलेली आहे.

असे असतानाच आता बांगलादेशमधील हिल्सा जातीच्या माशाचे तब्बल 8 ट्रक भारतात आले आहेत. हा मासा दुर्गा पूजेसाठी फार पवित्र मानला जातो. भारताने बांगलादेशकडून आयात केलेल्या हिल्सा माशांचे प्रमाण 2019 सालाच्या तुलनेत कमी आहे. पण या निमित्ताने भारत-बांगलादेश यांच्यात पुन्हा एकदा चांगली मैत्री होणार का? असे विचारले जात आहे.

बांगलादेशमधून भारतात हिल्सा माशांचे एकूण 8 ट्रक आले आहेत. या माशांचे एकूण वजन तब्बल 32 टन आहे. भारतातील उत्सव लक्षात घेऊन बांगलादशने भारताला 1200 टन हिल्सा मासे देण्यास मंजुरी दिली होती. 5 ऑक्टोबरपर्यंत हे सर्व मासे भारतात येणार आहेत.

आता बांगलादेशचा हिल्सा मासा भारतात पोहोचला आहे. त्यामुळे या व्यापारामुळे भविष्यात बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध बळकट होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.