‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील जीवा-नंदिनीचा सीन होतोय व्हायरल; का होतेय इतकी चर्चा?
जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या नात्याचं कोडं नेमकं कसं सुटणार हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका दररोज सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत मृणाल दुसानिस, विवेक सांगळे, विजय आंदळकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळतंय. मालिकेतल्या प्रत्येक सीनवर कौतुकाचा वर्षाव होतोय. जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलेलं असताना त्यांच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात आहे.

मालिकेत नुकताच जीवा-नंदिनीची मनधरणी करत असतानाचा सीन चित्रीत करण्यात आला. समुद्र किनारी एकटक पाहत असलेल्या नंदिनीसमोर जीवा कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो अश्या आशयाचा हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अश्विनी शेंडे आणि गौरव शिरीष या लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या या कवितेचे शब्द थेट मनाला भिडतात. नंदिनी आणि जीवाची भूमिका साकारणाऱ्या विवेक सांगळे आणि मृणाल दुसानिस यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने हा सीन आणखी खुलवलाय.

ज्या कवितेची सोशल मीडियावर इतकी चर्चा रंगतेय त्याचे शब्द काहीसे असे आहेत- 'तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं...सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं, तू सुगंध गज-याचा, माझं फिकं फिकं अत्तर..तुला पडणा-या प्रश्नाचं, मी शोधू पाहतोय उत्तर, सापडता सापडत नाहीये आपल्या नात्याचं मूळ...माझ्याही जुन्या फिलिंग्जवर जमली होती धूळ.'

'आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला काहीच कळत नाही...सगळं कळूनसुद्धा, वेळेत वळत नाही, पण तू पिळलास कान, आता आलीये मला जाग...आता तरी सोडून दे, नंदिनी तुझा राग, तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं...सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं', अशी ही कविता आहे.