
भारतीय स्वयंपाकाची ओळख मसाल्यांमुळे आहे; मात्र त्या मसाल्यांना चव आणि सुगंध देण्याचं काम तेल करतं. हळद,मीठ आणि मिरचीबरोबरच तेल हा प्रत्येक पदार्थाचा महत्त्वाचा घटक असतो.तेलाशिवाय फोडणी देणे शक्य नाही.

भाजीची ग्रेव्ही असो किंवा पराठ्याची कुरकुरीत लेअर असो; तेलाशिवाय भारतीय अन्न अपूर्ण वाटतं.गेल्या काही वर्षांत कुकिंग ऑईलविषयी अनेक संशोधनं समोर आली आहेत, ज्यात सांगितलं गेलं आहे की चुकीच्या किंवा जास्त प्रमाणात तेलाचं सेवन केल्यास हृदयाच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते.

डॉ.गोयल यांच्या मते,एक निरोगी व्यक्तीने रोज साधारण 3 ते 4 चमचे म्हणजेच सुमारे 15 ते 20 मिलिलिटरपेक्षा जास्त तेल घेऊ नये.याचा अर्थ असा की, एका निरोगी व्यक्तीसाठी महिन्याला 500 ते 600 मिलिलिटर तेल पुरेसं आहे. जर कुटुंबात 4 जण असतील, तर एकूण 2 लिटरपेक्षा जास्त तेलाचा वापर करु नये.

शरीरासाठी चांगली तेलं ही ती असतात ज्यात हृदयाला हानी न पोहोचवणारे फॅट्स असतात आणि जी शरीराला आवश्यक पोषण पुरवतात. हृदयासाठी ऑलिव्ह ऑईल खूप फायदेशीर आहे कारण त्यात मोनोसॅचुरेटेड फॅट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात.

कनोला तेल आणि सोयाबीन तेलही हृदयासाठी चांगली मानली जातात. कारण त्यात पॉलीअनसॅचुरेटेड फॅट्स असतात.तिळाचं तेल आणि सूर्यमुखी तेल देखील पोषक असून, अँटीऑक्सिडंट्सची मात्रा असल्यामुळे शरीराला फायदेशीर ठरतात.