एकमेकांच्या कुटुंबियांना भलतंसलतं बोलणं! या पाच गोष्टी पती पत्नीने टाळायला हव्यात, नाही तर…
संसाराचा गाडा पुढे नेणं हे पती आणि पत्नी या दोघांचं काम आहे. एकाने व्यवस्थित राहणं आणि दुसऱ्या वाटेल तसं वागणं संसारात वितुष्ट निर्माण करते. पती पत्नीने काही गोष्टी हाताच्या राखून बोलल्या तरच बरं असतं, नाही तर नात्यात दुरावा निर्माण होण्यास वेळ लागत नाही. चला जाणून घेऊयात त्याबाबत..

प्रेम विवाह किंवा घरच्यांनी ठरवून दिल्यानंतर दोन व्यक्ती लग्नबंधनात अडकतात. प्रेमविवाहात एकमेकांना ओळखून लग्नाचा निर्णय घेतला जातो. तर अरेंज मॅरेजमध्ये घरच्यांच्या संमतीसह एकमेकांची ओळखपालख करून लग्नाचा निर्णय घेतला जातो. असं असताना लग्नानंतर कधीच आपल्या पार्टनरला लग्न करून पश्चाताप झाला असं म्हणू नये. रागाच्या भरात बोलून गेलेलं हे वाक्य नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

लग्न करताना असलेली आर्थिक स्थिती कायम तशीच राहिल असं नाही. लग्नाच्या काही वर्षानंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक स्थिती समजून एकमेकांना सांभाळून घेणं गरजेचं आहे. चुकूनही एकमेकांच्या आर्थिक स्थितीवर टोमणे मारू नये. असं केल्यास नात्यात मिठाचा खडा पडू शकतो.

आयुष्यात प्रत्येक जण सर्व गुण संपन्न असतो असं नाही. काही ना काही उणीवा असतात. त्यामुळे जोडीदाराच्या उणीवांची खिल्ली उडवू नये. यामुळे मन खिन्न होतं. तसेच समोरचा व्यक्ती स्वत:ला कमी लेखू लागतो. इतकंच काय तर घरातील लहान मुलांवरही त्याचा परिणाम होतो.

भारतीय पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याचं मुख्य कारण हे कुटुंबिय असतं. भांडताना अनेकदा कुटुंबियांना वादात खेचलं जातं आणि त्यांच्याबाबत भलतंसलतं बोललं जातं. कुटुंबावर टीका केल्याने जोडीदाराला संताप होतो. त्यामुळे नातं मोडू शकतं.

पती पत्नीने आपल्यातील वाद किंवा राग चार भिंतीआड ठेवला तर बरं असतं. ओळखीच्या व्यक्ती किंवा कुटुंबासमोर वाईटसाईट बोलू नये. कारण सदर व्यक्तीने आपल्या जोडीदाराला सांगितलं तर भांडणं होऊ शकतात. इतकंच काय तर लग्न मोडण्यापर्यंत मजल जाते. (सर्व फोटो टीव्ही 9 हिंदीवरून )