
9 शेतकऱ्यांचे नुकसान : नायगाव तालुक्यातील अंतरगाव येथे वीज वितरणाच्या ताराच्या शॉट सर्किटमुळे घडलेल्या या घटनेत 9 शेतकऱ्यांचा 20 एकरातील ऊस जळाला आहे. शेतातूनच विद्युत वाहिनी गेल्याने हा प्रकार घडला आहे. बुधवारी दुपारी वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण झाले आणि हा प्रकार घडल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेती साहित्याचेही नुकसान : ऊसाच्या आगीच्या घटनांमध्ये केवळ ऊसाचेच नाही तर इतर शेती साहित्याचेही मोठे नुकसान होते. सिंचनासाठी ऊस क्षेत्रामध्ये ठिबक बसवण्यात आलेले असते. ऊसाला आग लागली की ठिबक, स्प्रिंक्लर अशा साहित्याचेही नुकसान होते. परिणामी उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत असतानाच अशा घटना समोर येत आहेत.

भरपाईची मागणी : यंदा वर्षभर निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले होते. याची भरपाई ऊस या नगदी पिकातून होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण आगीच्या घटनांमुळे ऊसाचीही राख होत आहे. त्यामुळे किमान आता पंचनामे करुन मदत देण्याची मागणी या 9 शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक अतिरिक्त ऊस : मराठवाड्यात यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न भेडसावत आहे.हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ही समस्या उद्धवली आहे.