
राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी राज्यातील विविध शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

उस्मानाबादमध्येही दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उस्मानाबादेतील स्मशानभूमीत एकाचवेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलीय.

उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या स्मशानभूमीत आज 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पडले. तर 8 मृतदेहांवर अद्यापही अंत्यविधी होणं बाकी आहे.

स्मशानभूमीत अवघ्या एक - एक फुटाच्या अंतराने सरण रचण्यात आली आहेत. त्यावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे काही मृतदेहांवर उशिराने अंत्यसंस्कार करण्याची वेळ येतेय.

कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासत आहे. त्यामुळे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडंही कमी प्रमाणात वापरली जात आहेत.

आज सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ न शकल्यामुळे राहिलेल्या मृतदेहांवर उद्या अंत्यविधी करण्यात येणार आहे. उस्मानाबादमधील कोरोना स्थिती अशीच राहिली तर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे.