महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू, आठवड्यातील मृत्यूची धक्कादायक आकडेवारी
chandrapur gadchiroli leopard and tiger: भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे. यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्यूमुखी पडले असून त्यातही राज्यातच सर्वाधिक ५२ मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रात वाघ आणि बिबटेच नव्हे, तर अस्वल आणि इतर प्राण्यांच्या हल्ल्यातही मानवी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४२६ मानवी मृत्यू आणि तीन हजार २२५ जण जखमी झाले.

महाराष्ट्रातील वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात आठवड्याला सरासरी एक मृत्यू होत आहे. तर १२ जखमी होत आहे. हे प्रमाण चिंताजनक आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे मानव-वन्यजीव संघर्षामुळे जास्त प्रभावित आहेत. २०२३ मध्ये या दोन जिल्ह्यांत वाघ, बिबटे आणि अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३८ जणांनी जीव गमावला.

संघर्षाचा हा आलेख दशकाहून अधिक काळापासून वाढत असताना केवळनिधीत सातत्याने वाढ करण्याव्यतिरिक्त ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. संघर्षात वन्यप्राण्यांचेही जीव जातात. १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतात एकूण ७६ वाघ मृत्यूमुखी पडले.

महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू झाल्यामुळे व्याघ्रसंवर्धन उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यावर सरकारकडून उपाययोजना अपेक्षित आहे.