
वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यावर पीककर्ज फेडण्यासाठी स्वतःसह पत्नी आणि मुलांची किडनी आणि इतर अवयव विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

कर्जाच्या बोजामुळे हवालदिल झालेल्या सतीश इढोळे यांनी आज वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत एक बॅनर अंगावर घालून उभे राहिले होते. या बॅनरवर विविध अवयवांचे दर लिहिले होते.

सतीष इढोळे यांनी किडनी ७५ हजार, लिव्हर ९० हजार आणि डोळे २५ हजार असे त्या बॅनरवर नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश इढोळे यांच्याकडे पीककर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे नाहीत. विकायला कोणताही शेतमाल शिल्लक नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी अखेर स्वतःसह कुटुंबातील सदस्यांचे अवयव विकायला काढण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी किडनीसह इतर अवयवांचे दर फलकावर लिहिले होते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याचे आवाहन केले.

शासनाच्या या भूमिकेमुळे आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेने वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा आणि सरकारी धोरणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.