
माहुली गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन तरुणांना दिशा चुकल्यामुळे गडावरच अडकून पडावे लागले होते. सध्या पावसाळी वातावरण असल्याने तसेच अंधार असल्याने ते दोघेही तिथेच अडकले होते.

पण सुदैवाने हेल्प फाउंडेशनच्या जीव रक्षक दलाने केलेल्या थरारक बचावकार्यामुळे या दोन्ही तरुणांना सुखरूप खाली आणण्यात यश आले. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

मालाड येथील रहिवासी असलेले रणजीत झा (१९) आणि आमिर मलिक (२०) हे दोघे ट्रेकिंगसाठी माहुली गडावर गेले होते. ट्रेकिंगदरम्यान रस्ता चुकल्यामुळे ते गडावरच अडकून पडले. त्यातच दिवस मावळत चालल्याने परिसरात अंधार दाटला होता.

तसेच पावसाळी वातावरण असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी मदतीसाठी ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधला. याबद्दलची माहिती मिळताच, शहापूर पोलिसांनी तात्काळ हेल्प फाउंडेशनच्या जीव रक्षक दल शहापूर यांच्याशी संपर्क साधला.

समीर चौधरी यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीमने क्षणाचाही विलंब न करता शोधमोहीम सुरू केली. अंधार, पाऊस आणि अवघड वाटा असतानाही, हेल्प फाउंडेशनच्या टीमने अन्न, पाणी आणि टॉर्च घेऊन तीन-चार तासांची खडतर चढण पार केली.

या संपूर्ण बचावकार्यादरम्यान टीमने अडकलेल्या तरुणांशी सातत्याने संपर्क साधून त्यांना धीर दिला. अखेर, सायंकाळी साडेसातच्या सुमारास टीमला दोन्ही तरुणांना शोधण्यात यश आले. या तरुणांना शोधल्यानंतर त्यांनी रात्रीच्या अंधारात माहुली गड उतरण्याची मोहीम सुरु केली.

या टीमने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने टॉर्चच्या प्रकाशात त्या दोघांना मधोमध घेऊन गड उतरण्यास सुरुवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. पहाटेच्या सुमारास दोन्ही तरुणांना सुखरूप गडाच्या पायथ्याशी आणण्यात आले.

'हेल्प फाउंडेशन'च्या या धाडसी आणि यशस्वी कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. झा आणि मलिक यांच्या कुटुंबियांनीही जीव वाचवणाऱ्या या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.