
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेतल्या सार्थक-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

सार्थक आनंदीवर जीवापाड प्रेम करतो. आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो. सार्थकच्या आग्रहाखातर आता त्याच्या आईने आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एक संधी दिली आहे.

स्वत:मध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेत आनंदी आणि सार्थकची हळद पार पडणार आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी आनंदीने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला आहे.

घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे हा विचार पटवून देणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षकांना जवळची वाटते.

सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पहाताना होते.