
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांचा बालपणातील प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न आणि जोतीरावांची शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड या सर्व टप्प्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

आता ही मालिका एका महत्त्वाच्या वळणावर येत आहे. लवकरच प्रेक्षकांना सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा अध्याय अनुभवायला मिळणार आहे. या टप्प्यात समाजातील रूढी-परंपरांची आव्हानं आणि सावित्रीबाईंनी शिकावं, स्वावलंबी व्हावं यासाठी जोतीरावांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.

सावित्रीबाईंना शिक्षणाची वाट खुली करून देण्यासाठी जोतीरावांनी दाखवलेली दूरदृष्टी, समाजाच्या चौकटी मोडण्याचं धैर्य वाखाणण्याजोगं आहे. नव्या पीढीसाठी मालिकेतलं हे पर्व नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. या नव्या टप्प्यात सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत.

त्यांच्या प्रभावी अभिनयातून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी कथा अधिक सशक्तपणे उलगडताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री राजसी भावे म्हणाली, "मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत असलेल्या तक्षा शेट्टीने ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळे तिच्याकडून खूप गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. ही भूमिका फार मनाच्या जवळची आहे. थोड्या काळासाठी का होईना ती साकारायला मिळणं पर्वणी आहे माझ्यासाठी."

अभिनेता अभिषेक देशमुख म्हणाला, "इतकं महान व्यक्तिमत्त्व साकारायला मिळतंय याचा आनंद गगनात मावत नाहीये. मी या मालिकेचा मोठा चाहता आहे. पहिल्या एपिसोडपासून ही मालिका मी न चुकता पाहतोय. मालिकेची कथा खूप अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्वक लिहिलेली आहे. त्यामुळे जेव्हा जोतीरावांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा वेगळा अभ्यास करावा लागला नाही. मालिकेच्या कथेतूनच माझा सराव आणि अभ्यास झाला."