
भारतीय लष्कराला अधिक मजबूत व तरुण सळसळत्या रक्ताचे बनवण्यासाठी भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भारताच्या भूदल, नौदल व हवाईदल या तिन्ही ठिकाणी आता 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना संधी मिळणार आहे.

यासाठी भारत सरकार 'टूर ऑफ ड्युटी'ची योजनेची अंमलबजावणी करणार आहे. या योजनेची नेमकी कशी असेल याबद्दल अद्याप सरकारनं अधिकृत माहिती दिलेली नाही.

भूदल, नौदल व हवाईदल या तिन्ही दलामध्ये 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांना संधी मिळणार आहे. मात्र या नोकरीचा कालावधी केवळ चार वर्षांचा असेल. मात्र या चार वर्षाच्या कालावधीमध्ये त्या-त्या जवानांच्या कामगिरीवर त्याला कायम केले जाणार आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भरती झालेले जवान लष्करसेवेत आपली ड्युटी बजावत असतानाच आपले शिक्षणही पूर्ण करता येणार आहे. या पद्धतीच्या भरती प्रक्रियेला 'टुर ऑफ ड्युटी' या नावाने संबोधले जाते.

टूर ऑफ ड्युटीची अंमलबजावणी सर्वात आधी लष्करात होईल. मग ती हवाई दल आणि नौदलात लागू केली जाईल. या दरम्यान तरुणांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांना त्या- त्या ठिकाणी तैनातही केलं जाईल. ठराविक कार्यकाळ संपल्यावर तरुण इतरत्र नोकरी करू शकतात.

टूर ऑफ ड्युटीची संकल्पना नोव्हेंबर 2020 मध्ये लष्करप्रमुख मनोज नरवणेंनी मांडली. संरक्षण मंत्रालयाला त्यांनी याची माहिती दिली. या योजनेच्या अंतर्गत तरुणांना दिलेल्या प्रशिक्षणाचा वापर त्यांना पुढे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होईल, असेही सांगण्यात आले होते

टूर ऑफ ड्युटीच्या भरती अंतर्गत 25 टक्के तरुणांना 3 वर्षांसाठी, तर 5 वर्षांसाठी सेवा देण्याची संधी देता येईल. तर उर्वरित 50 टक्के तरुणांना स्थायी सेवा देता येऊ शकते.

3 ते 5 वर्षे सेवा देणाऱ्या तरुणांना नॅशनल पेन्शन स्कीमच्या अंतर्गत आणलं जाईल अशी शक्यता आहे. या तरुणांना एका निश्चित कालावधीसाठी वैद्यकीय सुविधा दिल्या जातील.

भारत सरकारने या योजनेला अग्निपथ एंट्री असं नाव दिले आहे. देशातील बुद्धिमान तरुणांना वेगवेगळया दलात सामावून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. (सर्व फोटो भूदल, नौदल व हवाईदलाच्या इंस्टाग्राम पेजवरून साभार )

कोरोना महामारीमुळे लष्करात दोन वर्ष भरती होऊ शकली नाही. संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या अहवालानुसार लष्करात अधिकारी आणि सैनिकांची कमतरता आहे. या योजनेमुळे लष्करातील कमतरता भरून निघेल.