45 वर्षांत किती बदललं बॉलिवूड? संजय दत्त स्पष्टच बोलला.. “आता ही इंडस्ट्री खूपच..”
संजय दत्त लवकरच 'खलनायक रिटर्न्स' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा बल्लू ही भूमिका साकारणार आहे. एप्रिल महिन्यात या चित्रपटाची घोषणा झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो इंडस्ट्री किती बदलली आहे, याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

बॉलिवूडचा 'खलनायक' अर्थात अभिनेता संजय दत्त गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात काम करत आहे. संजूबाबाने बॉलिवूड इंडस्ट्रीला फार जवळून पाहिलं आहे. आता 45 वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर इंडस्ट्रीत किती बदल झाला आहे, याविषयीचा खुलासा त्याने केला आहे.

संजय दत्तने 1981 मध्ये 'रॉकी' या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यापूर्वी त्याने बालकलाकार म्हणूनही काम केलं होतं. 'रॉकी', 'खलनायक', 'वास्तव', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

एआयजी हॉस्पिटल्सच्या युट्यूब चॅनलवर डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांच्याशी बोलताना संजू बाबा त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. संजय म्हणाला, एकेकाळी चित्रपटसृष्टी ही एका कुटुंबासारखी होती, जिथे एकोपा आणि सौहार्दाची भावना होती.

"जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा ही इंडस्ट्री एका कुटुंबासारखीच वाटायची. सर्वजण एकत्र होते, सर्वजण एकमेकांना मदत करत होते. आता ही इंडस्ट्री खूपच तीव्र आणि स्पर्धात्मक झाली आहे. हे दु:खद आहे. पण मला आशा आहे की ते दिवस परत येतील", अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

यावेळी संजय दत्तने बॉलिवूडच्या एकतेची तुलना हॉलिवूडशी केली. "हॉलिवूड इंडस्ट्री आणि तिथले कलाकार खूप खंबीरपणे एकत्र उभे राहतात. तिथे अभिनेते असो किंवा लेखक, प्रत्येकजण खूप एकजूट आहे. प्रत्येकाला पाठिंबा देणाऱ्या संस्था आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही एक वेगळंच बंधुत्व दिसून येतं. जेव्हा एखादा अभिनेता पुरस्कार स्वीकारायला मंचावर जातो, तेव्हा कोणालाही मत्सर वाटत नाही. प्रत्येकजण मनापासून एकमेकांचा गौरव करत असल्याचं तुम्हाला स्पष्टपणे दिसतं. हे खरोखरंच खूप सुंदर आहे", असं तो पुढे म्हणाला.