Photo : जमलेल्या माझ्या तमाम… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक झंझावात!
मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी 19 जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. (Shiv Sena also rallied to get the rights of Marathi people)

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशा शब्दांनी भाषणाची सुरुवात करत राजकारण आणि समाजकारणातील व्यंगावर प्रहार करणारे नेते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी 19 जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि इथूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावाताला सुरुवात झाली. मराठी माणसाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेने प्रसंगी राडेही केले.

हिंसक आंदोलनं, मोर्चे, मेळावे, जाहीरसभा आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता घेतलेल्या सडेतोड भूमिका आदींमुळे शिवसेनेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपला धाक निर्माण केला.

बाळासाहेब म्हणजे घणाघाती वक्तृत्व... आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. पाकिस्तान विरोध, मुस्लिमांबाबतची मतं आणि हिंदुत्वाचा पुरस्कार यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. पण त्यांनी कधीच त्याची पर्वा केली नाही किंवा कधी आपल्या भूमिकांना मुरडही घातली नाही.

सुरुवातीला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेना नंतर पूर्णवेळ राजकारणात रमली. राजकारणाच्या सारीपाटावर शिवसेनेचा दोनदा मुख्यमंत्री बनविण्याची किमयाही शिवसेनेने साधली.

सामान्य माणसांपर्यंत बॉलिवूडकरांपर्यंत अनेकजण त्यांच्याकडे समस्या घेऊन येत आणि त्या सोडवल्या जात. त्यामुळे 'मातोश्री' हे राज्यातील दुसरे सत्ता केंद्र असल्यासारखं चित्रं निर्माण झालं होतं.

इतर राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेनेनेही अनेक पडझडी पाहिल्या. छगन भुजबळ यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. त्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

एवढेच नव्हे तर राज यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी वेगळा समांतर पक्षही काढला. पण शिवसेनेला त्याचा काही फरक पडला नाही. उलट शिवसेना उत्तरोत्तर वाढतच गेली. शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना लढण्याचं दिलेलं बाळकडू आणि आपल्या लाडक्या साहेबांप्रती शिवसैनिकांच्या असलेल्या अपार निष्ठेमुळेच शिवसेना वाढत गेली.