
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड दिसली. इंग्लंडचा संपूर्ण संघ 246 धावांवर तंबूत परतला. तर भारताने 1 गडी गमवून 119 धावा केल्या. इंग्लंडकडे अजूनही 127 धावांची आघाडी आहे. तर यशस्वी जयस्वाल नाबाद 76 आणि शुबमन गिल नाबाद 14 धावांवर खेळत आहे.

बीसीसीआयने दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली तेव्हा आवेश खानचीही संघात निवड करण्यात आली होती. मात्र पहिल्याच सामन्यापूर्वी त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आवेश खानसोबत नेमकं काय झालं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हैदराबादच्या फिरकी ट्रॅकवर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची गरज नव्हती. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आवेश खानला पुढील रणजी सामना खेळण्यासाठी पाठवले आहे.

मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज कर्णधार रोहित शर्माची पहिली पसंती होते. त्यामुळे आवेश खानला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही.

नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर बीसीसीआयने आपल्या अधिकृत X खात्यावर ही माहिती दिली. आता भारतीय संघ पहिल्या कसोटीत तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे.

संघातून बाहेर पडलेला आवेश सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या पुढील सामन्यात मध्य प्रदेशकडून खेळणार आहे. विराट कोहली पहिल्या दोन कसोटीत खेळणार नसल्यामुळे त्याच्या जागी रजत पाटीदारची निवड करण्यात आली आहे.