
इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी आणखी 332 धावा हव्या आहेत. तर टीम इंडियाकडून आर अश्विन याने एकमेव विकेट घेतली.

टीम इंडियाला जिंकायचं असेल तर गोलंदाजांनाच धमाका करावा लागेल. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या. बुमराहकडून दुसऱ्या डावातही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

टीम इंडियाने इंग्लंडसमोर 399 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मात्र अद्याप भारतात कोणत्याही टीमला इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. इंग्लंडने 2008 मध्ये टीम इंडिया विरुद्ध चेन्नईत 387 धावा करत विजय मिळवला होता. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. त्यामुळे आता इंग्लंडला इतिहास बदलायचा असेल तर अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल.

दुसऱ्या डावात टीम इंडियाची बॅटिंग फ्लॉप ठरत असताना शुबमन गिल याने धमाका केला. शुबमनने 12 डावानंतर शतक झळकावलं.

शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. शुबमन वयाच्या 24 व्या वर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. शुबमनआधी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या दोघांनी हा कारनामा केला आहे.

शुबमनने तिसऱ्या स्थानी बॅटिंग करताना हे शतक केलं. टीम इंडियासाठी 2017 नंतर तिसऱ्या स्थानी खेळताना केलेलं हे पहिलंवहिलं शतक आहे. तेव्हा चेतेश्वर पुजारा याने नागपूर टेस्टमध्ये श्रीलंका विरुद्ध 143 धावा केल्या होत्या.

इंग्लंडचा भारतात विजयी धावांचा पाठलाग करताना रेकॉर्ड फार चांगला नाही. इंग्लंडने 1972-1973 मध्ये यशस्वीरित्या विजयी धावांचा पाठलाग केला होता. तेव्हा इंग्लंडने 208 धावा केल्या होत्या.