
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी, तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. सध्या कसोटी मालिका सुरु असून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिज दौरा संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे.

भारत विरुद्ध आयर्लंड टी 20 मालिका डब्लिनमध्ये खेळवले जातील. हे सामने 18 ऑगस्ट, 20 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट रोजी असणार आहेत.

आयर्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर केलेला नाही. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया दौऱ्यात जाणार हे जवळपास नक्की आहे. पण या दौऱ्यात प्रशिक्षकासह सहाय्यक स्टाफही बदलला जाण्याचं वृत्त आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ आयर्लंड दौऱ्यावर जाणार नाही. कारण वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सध्याचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्म आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी राहुल द्रविड यांची जागा घेतील.
