Asia Cup स्पर्धेच्या इतिहासात फायनलमध्ये पराभूत होणारे संघ, पाकिस्तान कितव्या स्थानी?
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 4 संघच अंतिम फेरीत पोहचू शकले आहेत. या 4 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. या व्यतिरिक्त एकदाही इतर संघांना अंतिम फेरीत पोहचता आलं नाहीय.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी दिवसेंदिवस उत्सुकता पाहायला मिळत आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर थेट या स्पर्धेत खेळण्यासाठी उतरणार आहे. टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या 17 व्या आशिया कपआधी या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वाधिक वेळा पराभूत होणाऱ्या संघांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Acc X Account)

यंदा आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ भिडणार आहेत. याआधी 16 वेळा झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामने झाले आहेत. त्यापैकी कोणत्या संघाला सर्वाधिक वेळा उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलंय? जाणून घेऊयात. (Photo Credit : Acc X Account)

आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वाधिक वेळा पराभूत होण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेची या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीतील कामगिरी ही 50-50 अशी आहे. श्रीलंका 12 वेळा अंतिम फेरीत पोहचलीय. त्यापैकी 6 वेळा श्रीलंकेचा पराभव झालाय. तर श्रीलंकेने 6 वेळा आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. (Photo Credit : @OfficialSLC X Account)

बांगलादेश क्रिकेट टीम या यादीत दुसर्या स्थानी आहे. बांगलादेश 3 वेळा आशिया कप फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरली. मात्र बांगलादेश तिन्ही वेळा अंतिम फेरीत विजय मिळवण्यात अपयशी ठरली आहे. (Photo Credit : Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images)

पाकिस्तान या यादीत तिसर्या क्रमांकावर विराजमान आहे. पाकिस्तान 5 वेळा आशिया कप फायनलमध्ये पोहचली होती. पाकिस्तानला या 5 पैकी फक्त 2 वेळाच आशिया कप उंचावता आला. तर 3 वेळा उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. (Photo Credit :Tv9)

टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत एकूण 11 वेळा अंतिम फेरीत धडक दिलीय. भारताने 11 पैकी 8 वेळा अंतिम फेरीत विजय मिळवला. तर भारताचं 3 वेळा आशिया चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. (Photo Credit : AFP)