
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. रवींद्र जडेजा हा या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात उपकर्णधार पद सांभाळणार आहे. जडेजा टीम इंडियाचा हुकमाचा एक्का आहे. त्याने अनेकदा एकहाती सामने जिंकून दिलेत. मात्र गेल्या काही सामन्यांपासून त्याला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

जडेजाने आशिया कपमध्ये विकेट्स घेतल्या. जडेजा आशिया कप इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. मात्र जडेजाला धावा काही करता आल्या नाहीत. जडेजाने श्रीलंका विरुद्ध 4 आणि बांगलादेश विरुद्ध फक्त 7 धावा केल्या.

आशिया कपमध्ये जडेजाला 3 वेळा बॅटिंगची संधी मिळाली. मात्र त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तसेच त्याआधी झालेल्या विंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये त्याने निराशा केली. त्यामुळे जडेजाची बॅटिंग टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतेय.

टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. जडेजा बॅटिंगसाठी 6-7 व्या स्थानी येतो. अखेरच्या क्षणी केलेल्या काही धावा या निर्णायक ठरतात. मात्र तेच जडेजाला काही जमताना दिसत नाहीये.

दरम्यान बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी जडेजा, आर अश्विन आणि वाशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जडेजा वर्ल्ड कप टीममध्ये आहेच. त्यामुळे या वनडे मालिकेत सुंदर-अश्विन यांनी सर्वोत्तम कामगिरी केल्यास त्यांना वर्ल्ड कपमध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कपआधी जडेजाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटनेही धमाका पाहायला मिळेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.