
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पुणे येथे दुसर्या कसोटी सामन्यात 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडचा हा 3 सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडने यासह ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. भारताची मायदेशात 2012 नंतर मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताला 18 मालिकांनंतर ही सीरिज गमवावी लागली. भारताने 2000 पासून मायदेशात कोणत्या कर्णधारांच्या नेतृत्वात कसोटी मालिका गमावलेली हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाची 2000 पासून मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला मायदेशात 2000 साली 2-0 ने पराभूत केलं होतं. तेव्हा सचिन तेंडुलकर याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व होतं.

त्यानंतर 4 वर्षांनी 2004 साली ऑस्ट्रेलियाने भारताला लोळवलं. कांगारुंनी टीम इंडियाविरुद्ध 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होता.

त्यानंतर 8 वर्षांनी इंग्लंडने टीम इंडियाची मायदेशात मालिका विजयाची परंपरा खंडीत केली. इंग्लंडने 2012 साली टीम इंडियाला 2-1 ने पराभूत केलं. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होता.

तर आता 12 वर्षांनी मायदेशातील सलग 18 मालिका विजयानंतर होम सीरिज गमवावी लागली आहे. न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला आहे.