
मेलबर्न कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील आहेत. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी विराट कोहलीला आक्रमक वर्तनाचा फटका बसला आहे. आयसीसीने त्याला दंड ठोठावला आहे.

पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या सॅम कोनस्टासला विराट कोहलीने खांद्याने धक्का दिला. यामुळे कोनस्टास चांगलाच संतापला होता. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चमकमही झाली. हे प्रकरण मॅच रेफरीने गांभीर्याने घेतलं आहे. ही घटना हेतुपुरस्पर होती हे लक्षात घेऊन चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी विराट कोहलीने चूक मान्य केली आणि दंड ठोठावला.

चौथ्या कसोटी सामन्यात केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे विराट कोहलीला सामना फीच्या 20 टक्के दंड आणि गैरवर्तनासाठी एक डिमेरिट प्वॉइंट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या डावात विराट कोहलीला शिस्तीत खेळावं लागणार आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार, 24 महिन्यांच्या कालावधीत 4 डिमेरिट पॉइंट्स मिळाल्यास, खेळाडूवर एक कसोटी किंवा दोन वनडे सामन्यांची बंदी घातली जाईल. त्यामुळे कोहलीने पुन्हा डिमेरिट गुण मिळू नयेत याची काळजी घेणे अपरिहार्य आहे.

आयसीसीने मोहम्मद सिराजला एक डिमेरिट पॉइंट दिला होता. ॲडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडसोबत गैरवर्तन केल्याबद्दल सिराजला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला. त्यामुळेच मोहम्मद सिराज ब्रिस्बेन आणि मेलबर्न कसोटी सामन्यांमध्ये आक्रमक वागण्यापासून दूर राहिला आहे.