राजू शेट्टी यांची पुन्हा पदयात्रा, काय आहेत मागण्या
शंकर देवकुळे, सांगली | raju shetty swabhimani shetkari sanghatana | सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रेस पुन्हा सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राजू शेट्टी यांनी ही पदयात्रा सुरु केली आहे. राजारामबापू कारखाना साखराळे येथून ही पदयात्रा सुरु होणार आहे.

राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रोश पदयात्रा काढली होती. 30 ऑक्टोंबर रोजी त्यांनी ही यात्रा स्थगित केली होती. गेल्यावर्षी तोडलेल्या ऊसाला चारशे रुपये द्या, साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल करा या मागण्यांसाठी ही यात्रा पुन्हा सुरू झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे 30 ऑक्टोंबर रोजी राजू शेट्टी यांनी ही यात्रा स्थगित केली होती. यावर्षी तोडणाऱ्या उसाला पहिली उचल किती मागायची हे आम्ही ऊस परिषदेमध्ये ठरवू, असे राजू शेट्टी यांनी साखर कारखानादारांना ठणकावून सांगितले आहे.

राजाराम बापू कारखान्यांपासून राजू शेट्टी यांनी पुन्हा यात्रेस सुरुवात केली आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्यास दुसरा हप्ता ४०० रूपये द्या, या मागणीचे निवेदन कारखाना प्रशासनास देण्यात आले. त्यावर कारखाना प्रशानस काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

राजारामबापू कारखाना साखराळे येथून हुतात्मा कारखाना वाळवा - नागठाणे - अंकलखोप - भिलवडी - वसगडे असा पदयात्रेचा मार्ग असणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येणार आहे.
