
शुबमन गिल टीम इंडियावर सध्या ओझ बनलाय. या मॅचमध्ये गिल खातही उघडू शकला नाही. तो शुन्यावर बाद झाला. लुंगी एनगिडीने त्याला पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मागच्या सामन्यात तो चार रन्स करुन बाद झाला होता. त्यामुळे आता गिलच्या टीम इंडियातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कॅप्टन सूर्यकुमार यादवची बॅट पुन्हा एकदा तळपली नाही. सूर्या या सामन्यात 4 चेंडूत 5 धावा करुन आऊट झाला. सूर्याची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. एकवेळ जगातील अनेक गोलंदाजांवर सूर्यकुमार यादवने वर्चस्व गाजवलं होतं. पण आता त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय.

या मॅचमध्ये अर्शदीप सिंहने खूप सुमार दर्जाची गोलंदाजी केली. अर्शदीपने त्याच्या 4 ओव्हरमध्ये एकही विकेट न देताना 54 धावा दिल्या. त्याशिवाय एका ओव्हरमध्ये त्याने 7 वाइड चेंडू टाकले. त्यामुळे टीम इंडियाचं जास्त नुकसान झालं.

हार्दिक पांड्या मागच्या सामन्यात हिरो ठरला होता. पण या मॅचमध्ये फ्लॉप प्रदर्शन केलं. 3 ओव्हरमध्ये 34 धावा देऊन एकही विकेट काढली नाही. फलंदाजी सुद्धा खराब केली. त्याने 23 चेंडूत फक्त 20 धावा केल्या. 214 धावांचा पाठलाग करताना हार्दिक कडून इतक्या धीम्या फलंदाजीची अपेक्षा नव्हती.

टीम इंडियाचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह सुद्धा काही खास करु शकला नाही. त्याने 4 ओव्हरमध्ये 45 धावा देऊन एकही विकेट काढला नाही. बुमराह जेव्हा इतका महागडा ठरतो, तेव्हा टीम इंडियाची हालत खराब होणं स्वाभाविक आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीला लगाम घालू शकला नाही.