तुमच्या टाकीतून मासे मेल्यासारखा पाण्याचा वास येतो? ही ट्रीक वापरा येईल काचेसारखं स्वच्छ पाणी
तुमच्या देखील घरावरील किंवा छतावरील टाकीमधून घाण मासे मेल्यासारखा वास येतो का? जर येत असेल तर या सर्वात सोप्या पद्धतीने करा दुर्गंधी दूर.

पावसाळ्यात घरातील स्वच्छतेसोबतच पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकजण स्वयंपाकघर, फरशी आणि इतर भागांची स्वच्छता करतात, मात्र पाण्याची टाकी साफ करण्याकडे दुर्लक्ष करतात.

त्यामुळे टाकीत शेवाळ, घाण आणि जीवाणू साचून पाण्याला माशांसारखी दुर्गंधी येऊ शकते. अशा दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.

तज्ज्ञांच्या मते, पाण्याच्या टाकीचे झाकण नेहमी घट्ट बंद ठेवावे. उघड्या टाकीत धूळ, पाने, कीटक, डास आणि इतर घाण सहज प्रवेश करते. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होते.

टाकीची किमान तीन महिन्यांतून एकदा संपूर्ण स्वच्छता करणे आवश्यक आहे. टाकी रिकामी करून ब्रशच्या साहाय्याने आतील शेवाळ आणि घाण काढावी. त्यानंतर स्वच्छ पाण्याने टाकी व्यवस्थित धुवूनच पुन्हा वापरावी.

पाण्यात हलकी दुर्गंधी येत असल्यास लिंबाचा रस वापरून ती काही प्रमाणात कमी करता येते. मात्र पाणी जास्त दूषित असल्यास केवळ लिंबावर अवलंबून न राहता प्रथम टाकीची संपूर्ण स्वच्छता करणे गरजेचे आहे.

टाकीत जीवाणूंची समस्या अधिक असल्यास योग्य प्रमाणात क्लोरीनचा वापर करता येतो. मात्र क्लोरीन वापरल्यानंतर पाणी पिण्यापूर्वी ते योग्यरीत्या तपासणे किंवा फिल्टर करूनच वापरणे सुरक्षित ठरते. याशिवाय टाकीतील पाणी दीर्घकाळ साचून राहू देऊ नये. पाण्याचा नियमित वापर होईल आणि नवीन पाणी सतत येत राहील याची काळजी घ्यावी. नवीन पाण्याची टाकी खरेदी करताना दर्जेदार आणि सूर्यप्रकाशाचा कमी परिणाम होणारी टाकी निवडावी.