पाठदुखीचा त्रास तरी का सोडली नाही मालिका? ‘तारक मेहता..’मधील बाघा स्पष्टच बोलला..
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता..' या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या भूमिकेबद्दल आणि सेटवरील वातावरणाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारिया गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच मालिकेत काम करतोय. बाघाच्या भूमिकेसाठी त्याला शूटिंगदरम्यान तासनतास पाठ वाकवून उभं राहावं लागतं. यामुळे त्याला पाठदुखीचा प्रचंड त्रास होत आहे. तरीही त्याने ही मालिका सोडण्याचा विचारदेखील केला नाही.

गेल्या काही वर्षांत 'तारक मेहता..'मधून बरेच कलाकार बाहेर पडले. मात्र 2011 पासून तन्मयच बाघाच्या भूमिकेत कायम आहे. त्याने ही भूमिका सोडण्याचा किंवा दुसरं काही करण्याचा विचारसुद्धा केला नाही. यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, "माझ्यासाठी काम हे काम आहे. मी असे विचार माझ्या डोक्यात आणूही देत नाही, कारण जेव्हा हाती काहीच काम नसतं, तेव्हा कसं वाटतं, हे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे."

बाघाची भूमिका साकारून मी खूप खुश असल्याची भावना तन्मयने व्यक्त केली. या भूमिकेविषयी त्याने पुढे सांगितलं, "मी यात फक्त कॉमेडीच करत नाही. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत माझे अनेक भावनिक सीन्स सुरू आहेत. संपूर्ण टीम आणि कलाकार हे जणू माझ्या दुसऱ्या कुटुंबासारखेच आहेत. त्यांच्यासोबत मी सर्वाधिक काळ असतो. इथे प्रत्येकजण एकमेकांची मदत करतात."

या मालिकेच्या वादाबद्दल बोलताना तन्मय पुढे म्हणाला, "कुटुंबात छोटे-मोठे वाद होणं स्वाभाविक आहे. दुर्दैवाने इंटरनेट आणि मीडिया त्यांना अवास्तव महत्त्व देतं. जर मी एखादा सीन नीट केला नाही, माझ्या अभिनयात काही कमतरता आहे, हे कोणी पसरवलं तर त्या गोष्टीला वेगळं वळण लागतं. पण नेहमीच परिस्थिती जशी दिसते तशी नसते. कधीकधी वाद झाल्यास, सर्वजण एकमेकांची माफी मागतात."

"जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी हे सेटवरील सर्वांत ज्येष्ठ अभिनेते आहेत. सेटवर एक अशी मर्यादा असते, जी कोणताही कलाकार ओलांडत नाही. ज्येष्ठ कलाकारांसोबतचे विनोद त्या मर्यादेतच ठेवले जातात. आम्ही इतर कमी वयाच्या कलाकारांमध्ये खूप मजा-मस्ती सुरू असते", असंही तन्मयने सांगितलं आहे.