
यवतमाळ जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड येथे तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीची मानवी वस्ती आढळून आली आहे.

या उत्खननात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक यांच्या काळातील मडक्यांची खापरे आणि सातवाहन राजघराण्यातील सहा विहिरींचे अवशेष सापडले आहेत.

नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी उत्खननाला सुरुवात केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील पाचखेड येथे 26 मार्च 2025 पासून संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभास साहू आणि प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्खनन सुरू आहे.

या उत्खननात इ.स.पूर्व 1000 म्हणजेच आजपासून सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या महापाषाण युगातील लोहयुगीन लोकवस्तीच्या घरांचे महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत.

या काळात घरे गोलाकार आकाराची असून ती कुडाच्या साहाय्याने उभारली जात होती, असे दिसून आले आहे.

पाचखेडच्या या उत्खननात महापाषाण लोहयुगीन काळातील लोखंडाचे अवशेष तसेच तत्कालीन चुलींचे अवशेषही प्राप्त झाले आहेत.

पाचखेडचे हे उत्खनन स्थळ स्थानिक पातळीवर सासू-सुनेचे उखाडे आणि बरड या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे, पांढऱ्या मातीची ही टेकडी सध्या पाचखेड गावातील स्मशानभूमी म्हणून उपयोगात आणली जाते.

या ऐतिहासिक शोधांमुळे पाचखेड आणि परिसरातील प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाचे पुढील उत्खनन या भागाच्या इतिहासावर आणखी नवीन माहिती उघड करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.