Abdul Sattar | मराठवाड्यातील सावंत, भूमरे, शिरसाटांना मंत्रिपद मिळणार, सत्तारांनाही फोन, मुंबईत दाखल, निर्णय काय होणार?

| Updated on: Aug 09, 2022 | 10:34 AM

राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत शिक्षकां साठी बंधनकारक असलेल्या टीईटी 2019 या वर्षीच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते.यात अब्दुल सत्ततार यांच्या दोन मुलींनाही अपात्र ठरवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र अब्दुल सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Abdul Sattar | मराठवाड्यातील सावंत, भूमरे, शिरसाटांना मंत्रिपद मिळणार, सत्तारांनाही फोन, मुंबईत दाखल, निर्णय काय होणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता काही तासांवर येऊन ठेपलाय. भाजप आणि शिंदे गटातील कोणत्या आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मराठवाड्यातून तानाजी सावंत (Tanaji Sawant), संदिपान भूमरे, संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. या आमदारांना मुंबईतून तसे फोन आले असून औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनादेखील मुंबईतून फोन आल्याची माहिती हाती आली आहे. अब्दुल सत्तार यांनी टीईटी घोटाळ्यात लाभ घेतल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारण्यात येत आहे. मात्र मुंबईत होणाऱ्या बैठकीला सत्तार यांना बोावण्यात आले असून अब्दुल सत्तार मुंबईत दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री शिंदे सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला सत्तार उपस्थित राहणार असून त्यानंतरच त्यांची प्रतिक्रिया समजू शकेल.

सत्तार मुंबईत दाखल

माजी मंत्री अब्दुल सत्तार मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात येईल. शिंदे गटात गेल्यानंतर मंत्रिपदाची आशा लागलेल्या अब्दुल सत्तारांचं ऐनवेळी टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने त्यांचं मंत्रिपद या टप्प्यात तरी हुकल्याचं दिसून येतंय. दरम्यान, विरोधकांकडून टीईटी घोटाळ्याची सविस्तर चौकशी होण्याची मागणी केली जातेय. त्यामुळे अब्दुल सत्तारांबाबत काय निर्णय घ्यायचा, यावर या बैठकीत काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

टीईटी घोटाळ्यात सत्तारांवर कोणते आरोप?

राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत शिक्षकांसाठी बंधनकारक असलेल्या टीईटी 2019 या वर्षीच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. या परीक्षेत जवळपास 7 हजार 800 अपात्र विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्र देऊन पास करण्यात आल्याचे आढळले होते. परीक्षेत गैरहजर, अपात्र तसेच दुसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्यांनाही प्रमाणपत्र वाटप झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढील काळात परीक्षा बंदी झाली. 3 ऑगस्ट रोजी हे आदेश काढण्यात आले. यात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींनाही अपात्र ठरवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र अब्दुल सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शिंदे गट कोण कोण शपथ घेणार?

संजय शिरसाट, संदिपान भूमरे, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई, दादा भुसे, उदय सामंत, राजेंद्र पाटील यड्रावकर, भरत गोगावले हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.