Ambadas Danve | मुख्यमंत्र्यांवर अब्दुल सत्तारांचा दबाव, सत्तारांची शक्ती जास्त की शिंदेंची? अंबादास दानवेंचा खोचक सवाल

| Updated on: Aug 10, 2022 | 11:06 AM

मंत्रीमंडळ विस्तारातही अपेक्षा खूप लोकांच्या असतात, त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. पण जर आपणच शब्द दिला असेल, तर तो पाळण्यासाठी निश्चित दबाव येऊ शकतो, असंही दानवे म्हणाले.

Ambadas Danve | मुख्यमंत्र्यांवर अब्दुल सत्तारांचा दबाव, सत्तारांची शक्ती जास्त की शिंदेंची? अंबादास दानवेंचा खोचक सवाल
शिवसेना आमदार अंबादास दानवे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः टीईटी घोटाळ्यात कनेक्शन उघड झालं असतानाही शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिपद देण्यात आलं. यावरून आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल आहे. अब्दुल सत्तारांचा मुख्यमंत्र्यांवर एवढा दबाव आहे की, त्यांना मंत्रिपदही नाकारता आलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) शक्ती जास्त आहे की सत्तारांची हा प्रश्न उपस्थित होतोय, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल मंगळवारी पार पडला. दरम्यान, त्यापूर्वीच टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींनीही लाभ घेतल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे या घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतरही सत्तार यांना मंत्रिपद मिळणार नाही, अशी चर्चा होती. पण मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी सत्तारांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यांचा शपथविधीही पार पडला. घोटाळ्याचे आरोप असणाऱ्यांना मंत्रिपद कसं दिलं, यावरून विरोधकांनी जोरदार टीका सुरु केली आहे. याच मालिकेत अंबादास दानवे यांनीही मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केलाय.

काय म्हणाले अंबादास दानवे?

अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद दिल्यानंतर कालच अंबादास दानवे यांनी हे गद्दारांचं आणि दागी लोकांचं सरकार असल्याचं म्हटलं आहे. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘ अब्दुल सत्तार सारखा आमदार जर मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहे तर मुख्यमंत्र्यांची शक्ती जास्त की अब्दुल सत्तार यांची, याचा विचार करावा लागेल… मंत्रीमंडळ विस्तारातही अपेक्षा खूप लोकांच्या असतात, त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. पण जर आपणच शब्द दिला असेल, तर तो पाळण्यासाठी निश्चित दबाव येऊ शकतो, असंही दानवे म्हणाले.

नितीश कुमारांचा निर्णय स्वाभिमानाचा…

भाजपने महाराष्ट्रात केलेल्या दबावाच्या राजकारणाचे परिणाम चांगले होणार नाहीत, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाविरोधी भूमिका घेत स्वाभिमानाचं पाऊल टाकल्याचं वक्तव्यही दानवे यांनी केलंय. ते म्हणाले, आपल्या कडच्या एका दैनिकाचे ब्रीदवाक्य आहे. शेळी म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा, सिंह म्हणून एक दिवस जगणं सार्थकी लागत असतं.. जर नितीश कुमार यांना वाटत असेल, की आपण शेळी म्हणून जगत आहोत, तर त्यांनी एक दिवस सिंह म्हणून जगण्याचा स्वाभिमानाचा निर्णय घेतला असावा…

दमननीतीविरोधात विस्फोट होईल..

बिहारमधील भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्रात भाजपनेच शिवसेना फोडल्याचं त्यांनी सांगितलं. जिथे जिथे भाजपला इतर पक्ष दगा देतील, तिथे हेच परिणाम होतील, असंही ते म्हणाले. सुशील कुमार मोदींना उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, भाजपची इंग्रजांसारखी नीती आहे. आधी जोडायच, मग फोडायचं.. या सर्व दमननीती विरोधात एक दिवस नक्की हिंदुस्थानात विस्फोट होईल..