Aditya Thackeray : आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, आमचा धर्म सेवाधर्म – आदित्य ठाकरे; राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलणं टाळलं

राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यासाठी भाजपकडून होणाऱ्या विरोधावर युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलणं टाळलं. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केलीय.

Aditya Thackeray : आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, आमचा धर्म सेवाधर्म - आदित्य ठाकरे; राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलणं टाळलं
आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख
Image Credit source: TV9
Reporter Rajiv Giri | Edited By: sagar joshi | Updated on: May 10, 2022 | 4:15 PM

नांदेड : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी पर्यायानं शिवसेना विरुद्ध भाजप आणि मनसे असा संघर्ष सध्या सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलीय. तसंच शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अयोध्येत रामलल्लाचं दर्शनही घेऊन आले. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला आता उत्तर प्रदेशातील भाजप आमदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यासाठी भाजपकडून होणाऱ्या विरोधावर युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलणं टाळलं. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केलीय. नांदेडमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

10 जून रोजी अयोध्येला जाणार

आदित्य ठाकरे यांनी आपण 10 जून रोजी अयोध्येत जाणार असल्याची घोषणा केलीय. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांसाठी आणि रामराज्यासाठी, प्रभुरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी आपण 10 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं ते म्हणाले. मात्र, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराकडून होणाऱ्या विरोधावर बोलणं त्यांनी टाळलं.

‘आम्हाला धर्म, हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही’

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. आम्हाला धर्म, हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आमचा धर्म सेवाधर्म आहे. आमचं हिंदुत्व ‘रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये’ असं असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील तिनही घटकपक्षांनी दिलेलं वचन आम्ही पूर्ण करणार असा दावाही आदित्य यांनी यावेळी केला आहे.

‘आम्ही लोकांची सेवा करत आहोत’

आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील लोक एकत्र आले आहेत. आम्ही लोकांची सेवा करत आहोत. कोव्हिडचं एवढं मोठं संकट आलं. पण आम्ही थांबलो नाही. रायगडाला आम्ही सहाशे कोटी रुपये दिले. शेतकऱ्याची कर्जमाफी केली. पण त्याची प्रसिद्धी झाली नाही. पुढच्या वेळेला उपजिल्हा रुग्णालयाचे काम करणाऱ्या मंडळींचा सत्कार करू. धर्म, हिंदू म्हणजे काय हे शिकण्याची आम्हाला गरज नाही. सेवा आमचा धर्म आहे. आपण खंबीरपणे आमच्या मागे रहा, नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Follow Us