महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे

| Updated on: Jan 29, 2020 | 11:07 PM

पुण्यात इकोफ्रेंडली मटेरिअल वापरले जातात. त्यामुळे पुणे महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा देऊ शकते.

महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते : आदित्य ठाकरे
Follow us on

पुणे : “पुण्यात इको-फ्रेण्डली मटेरिअल वापरले जातात. त्यामुळे महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते”, असं मत पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं (Aditya Thackeray). पुण्यात ते ‘कार्बन न्यूट्रल 2030 कॉन्फरन्स’नंतर माध्यमांशी बोलत होते. पुणे ‘कार्बन न्यूट्रल’ करण्यासाठी 2030 लक्ष आहे. मात्र, पुणे 2025 मध्येच ते पूर्ण करेन, अशी अपेक्षा यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच, पुण्यातील सॉलिड वेस्ट मटेरिअल मॉडेल मुंबईत आणणार, त्याचबरोबर बांबू आणि कापडी पिशवी ही संकल्पना राज्यातच नाही देशात देण्याची गरज आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले (Carbon Neutral 2030 Conference).

राज्याच्या विरोधात असेल तिथे स्थगिती दिली जाईल : आदित्य ठाकरे

आरे कॉलनीतील मेट्रोचे शेड आणि नवी मुंबईतील गोल्फ क्लबसह इतर प्रकल्पाच्या स्थगितीवरुन सरकारवर आरोप होत आहेत. मात्र, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या विरोधात असेल तिथे स्थगिती दिली जाईल. पर्यावरणाची हानी होणार नाही, पर्यावरणाला धोका होणार नाही, ही आमची भूमिका असल्याचं ठासून सांगितलं. सरकार पर्यावरणासाठी सकारात्मक असून महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्यात आणणार असल्याचं सांगितलं.

राज्यात पर्यावरणाला हानी होणाऱ्या ठिकाणी स्थगिती दिली जाईल. मेट्रोचं काम थांबलं नसून वस्तूस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुम्हाला जर झाडं तोडायची असेल तर करा, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

पुण्यातील आफ्टरनून लाईफवर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

पुण्यातील आफ्टरनून लाईफ सुरु करण्याच्या त्यांच्या विधानावरही आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. “गमतीवर कशी काय निगेटिव्ह रिअॅक्शन असू शकते. पुणेकरांना तो जोक असल्याचं माहीत आहे. पुणेकर स्वतःही जोक्स करतात. याप्रकरणी तुम्ही वेगळा अर्थ लावून हा मुद्दा विनाकारण खेचू नका. पुणेकरांना माहिती मी काय बोललो”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी एकत्र आली : आदित्य ठाकरे

या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी मत्री अशोक चव्हाणांच्या वादग्रस्त विधानावरही भाष्य केलं. “राज्यात महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी एकत्र आली आहे. अशोक चव्हाण साहेब असं काही बोलले हे मी कुठे ऐकलं नाही. त्यासंदर्भात माहिती घेईन”, असं त्यांनी म्हटलं.

“सरकारमध्ये पर्यावरण आणि पर्यटन विभाग मिनिस्ट्री समजत नाही. दोन्ही खाती साईड मिनिस्ट्री समजली जातात. मात्र या खात्याला भविष्य असून क्षमताही खूप आहे. हे खातं जनताभिमूख करायचं असून नागरिकांचा सहभाग वाढवायचा आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “हवा पाणी आणि वायू प्रदूषणामुळे वातावरणावर परिणाम झाला. दिवसेंदिवस पावसाच्या ऋतुमानात फरक झाला आहे. त्यामुळे ट्राफिक व्यवस्थापन, पब्लिक वाहतूक व्यवस्था सार्वजनिक वाहतूक व्यवस्थावर भर देण्याची गरज आहे. त्यामुळे ही दोन्ही खाती सर्वच खात्यात महत्त्वाचा रोल आहे”, असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

“मुंबईत इलेक्ट्रिक बस धावत असून पुढील वर्षी आणखी बसेस धावणार आहेत. त्याचबरोबर मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवर चार्जिंग स्टेशन संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाची चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दुतर्फा रिकाम्या जागा असतात. अशा रिकाम्या जागांवर सोलर पॅनल उभारण्याचाही विचार आहे”, अशी माहिती पर्यटन मंत्र्यांनी दिली.

“पुण्यातील बीआरटी प्रकल्प गुंडाळणार असेल तर इतर पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. ई-रिक्षा, ई-सायकल पर्यायी विचार करणं गरजेचं आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.