संग्राम जगताप यांना उमेदवारी, कर्डिले, थोरात, राजळे, कोतकर सर्व एकवटणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

अहमदनगर: अहमदनगरमधून लोकसभेसाठी भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीकडून संग्राम जगपात यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी मास्टरस्ट्रोक मारल्याचं बोललं जातंय. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगरशहरमधून सध्याचे आमदार आहेत. शरद पवार पुन्हा 1991 ची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विखेंविरुद्ध सर्वच राजकीय पक्षातील नेते एकवटणार असल्याचं चित्र जिल्ह्यात तयार झालं आहे. राष्ट्रवादीकडून संग्राम […]

संग्राम जगताप यांना उमेदवारी, कर्डिले, थोरात, राजळे, कोतकर सर्व एकवटणार?
Follow us on

अहमदनगर: अहमदनगरमधून लोकसभेसाठी भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीकडून संग्राम जगपात यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवारांनी मास्टरस्ट्रोक मारल्याचं बोललं जातंय. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगरशहरमधून सध्याचे आमदार आहेत. शरद पवार पुन्हा 1991 ची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विखेंविरुद्ध सर्वच राजकीय पक्षातील नेते एकवटणार असल्याचं चित्र जिल्ह्यात तयार झालं आहे. राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच, त्यांचे वडील आमदार अरुण जगताप यांनी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका केली. कोणाची खुन्नस काढणं आमचं काम नसून, सर्वच जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करतो, असं आमदार अरुण जगताप म्हणाले. महत्वाचे म्हणजे भाजपचे नेते देखील माझ्या संपर्कात आसल्याचा दावा अरुण जगतापांनी केला.

नगर जिल्ह्यात विखेंचं वर्चस्व मानलं जातं. मात्र विखे नेहमीच पाडापाडीचं राजकारण करत आले आहेत. त्यामुळे आता बदला घेण्यासाठी सर्वच पक्षातील नेते विखेंना पाडण्याची संधी सोडणार नाही अशी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. दुसरीकडे विखे भाजपात आल्याने भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांची नाराजी विखे दूर करण्यात यशस्वी होणार का असा प्रश्न आहे.

डॉ सुजय विखेंनादेखील ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. सुजय विखे गेल्या साडेचार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असं आमदार संग्राम जगताप म्हणाले.

सुजय विखे यांच्यासमोरील आव्हाने

1)भाजपा आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप हे व्याही आहेत. शिवाजी कर्डिले यांची मुलगी आमदार संग्राम जगताप यांची पत्नी आहे. अरुण जगताप हे विधानपरिषदचे आमदार आहेत. त्यामुळे आमदार संग्राम जगतापांना राष्ट्रवादीने लोकसभेची उमेदवारी दिल्याने, आता सासरे आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.  कर्डिले भाजपचा प्रचार करणार की आपले नातेसंबंध जपण्यासाठी जावई संग्राम जगताप यांचा प्रचार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2) भाजप आमदार मोनिका राजळे यांचे पती स्वर्गीय राजीव राजळे हे काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. राजीव राजळे 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लोकसभेचे उमेदवार होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यात विखेंचा मोठा वाटा असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. शिवाय राजळे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. विखे आणि थोरात यांचं वैर सर्व राज्याला माहित आहे. त्यामुळे सुजय भाजपात गेल्याने थोरात यांना विखे यांच्याविरुद्ध थेट प्रचार करण्याची संधी मिळाली आहे. म्हणून थोरात आपल्या नात्याचा फायदा घेत राजळे यांना नेमका कोणाचा प्रचार करायला सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सासरे शिवाजी कर्डिलेंची गोची झालीय का? जावई संग्राम जगताप म्हणतात….

3) दुसरीकडे स्व. राजीव राजळे यांची बहीण माजी खासदार यशवंतराव गडाखांच्या परिवारात दिली आहे.तर गडाख आणि विखे संघर्षची ख्यातीही राज्यभर आहे. त्यामुळे गडाखदेखील काय भूमिका घेता हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे

4) या निवडणुकीत कोतकर कुटुंबाची भूमिकादेखील महत्वाची ठरणार आहे. कोतकर कुटुंब सध्या भाजपात असून ते भाजप म्हणून विखेंचा प्रचार करणार की नाते जपण्यासाठी जगताप यांचा प्रचार करणार हा प्रश्न आहे.

आता या सर्व नात्यागोत्यांचा राजकारणात विखे पाटील काय जादू करणार हे पाहावं लागेल. विशेष म्हणजे शरद पवार या मतदारसंघात विशेष लक्ष देणार यात काही शंका नाही. त्यामुळे पवारांनी 1991 ची पुनरावृत्ती करण्याचा इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष नगर मतदारसंघाकडे लागलं आहे.

कसं आहे सोयऱ्या-धायऱ्यांचं राजकारण?

कार्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि सध्या नगरसेविका आहेत.

कार्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका आहेत.

आता तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केलाय. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे, आता त्याची पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आहेत.

कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे आमदार असून नगर तालुक्यतील बुऱ्हानगर भागात राहतात. मात्र त्यांचे काही मतदार हे नगर तालुक्यात आणि शहराच्या काही भागात येतात. त्यामुळे नगर शहराच्या राजकारणात त्यांचं मोठं वर्चस्व मानलं जातं. तर त्यांचे व्याही भानुदास कोतकरांचे केडगाव भागात वर्चस्व आहे. गेल्या 40 वर्षांपासून केडगाव परिसरात कोतकर कुटुंबाची दहशत आहे. भानुदास कोतकर यांना तीन मुलं आहेत, तर मोठ्या मुलाची पत्नी ही कर्डिले यांची मुलगी आहे. त्यामुळे कोतकर कोणत्याही पक्षात असले तरी त्याला आतून कर्डिलेंचा पाठींबा असतोच, अशी चर्चा शहरात नेहमीच असते.

बाजार समितीच्या राजकारणात कर्डिले आणि कोतकर हे आपल्या हातात सत्ता रहावी यासाठी आपल्या सोयीनुसार राजकारण करतात. महापालिका निवडणुकीत देखील कार्डिलेंचे दुसरे व्याही आमदार अरुण जगताप यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत कर्डिले आणि जगताप यांची छुपी युती असल्याची चर्चा शहरात नेहमीच असते. त्यामुळे पक्ष कोणतेही असो, किंगमेकारच्या भूमिकेत कर्डिलेंचंच नाव पुढे येत असतं.

संबंधित बातम्या

नगरमध्ये शिवाजी कर्डिलेंची गोची, एकीकडे जावई, तर दुसरीकडे पक्षाचा उमेदवार 

कर्डिले-जगताप-कोतकर, नात्यागोत्याचं नगरचं राजकारण