मुस्लीमबहुल मुंब्रा-कळव्यातून एमआयएमच्या उमेदवाराची अचानक माघार

अधिकृत उमेदवार बरकतउल्लाह अली हसन शेख उर्फ गुंजन शेख (Mumbra Kalwa AIMIM candidate) यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा मार्ग आणखी सुकर झालाय.

मुस्लीमबहुल मुंब्रा-कळव्यातून एमआयएमच्या उमेदवाराची अचानक माघार
| Edited By: | Updated on: Oct 07, 2019 | 9:20 PM

ठाणे : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा (Mumbra Kalwa AIMIM candidate) मतदारसंघातून एमआयएमच्या उमेदवाराने अचानक माघार घेतली. यामुळे एमआयएमची मोठी अडचण झाली आहे. अधिकृत उमेदवार बरकतउल्लाह अली हसन शेख उर्फ गुंजन शेख (Mumbra Kalwa AIMIM candidate) यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा मार्ग आणखी सुकर झालाय. शिवसेनेकडून या मतदारसंघात अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी देण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं कळवा-मुंब्रा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. 2014 च्या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांनी तब्बल 1 लाख 18 हजारांपेक्षा जास्त, तर शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांना 38 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. 2014 ला या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या आणि भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता.

मुंब्रा-कळव्यातून जितेंद्र आव्हाड यांनी 2009 च्या निवडणुकीतही मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवार देण्यात आला आहे, शिवाय एमआयएमच्या उमेदवारामुळे मतविभाजनाचा धोका होता, पण ही उमेदवारी मागे घेऊन एक प्रकारे जितेंद्र आव्हाड यांना दिलासाच मिळाला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाई यांनी उमेदवारी मागे घेतली. देसाई यांची उमेदवारी मागे घेण्यामध्ये मनसेला छुपा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरु झाली आहे. त्यामुळे आता ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात दुहेरी लढत दिसणार आहे.

शिवसेना नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी, तर ओवळा माजिवडा मतदारसंघात मात्र कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.