तिकीट का कापलं हे विचारण्यासाठी आले असतील, अजित पवारांचा विनोद तावडेंना टोला

| Updated on: Nov 05, 2019 | 9:09 PM

राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar on Vinod Tawde) माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना जोरदार टोला लगावला आहे.

तिकीट का कापलं हे विचारण्यासाठी आले असतील, अजित पवारांचा विनोद तावडेंना टोला
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar on Vinod Tawde) माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना जोरदार टोला लगावला आहे. विनोद तावडे यांनी आपलं तिकीट का कापलं हे विचारण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली असावी, असा अंदाज व्यक्त करत अजित पवारांनी (Ajit Pawar on Vinod Tawde) तावडेंना कोपरखळी लगावली. ते राज्यपालांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “विनोद तावडे स्वतः विधानसभा निवडणुकीचे सदस्यही नाहीत. त्यांना सरकार स्थापनेत मतदानाचाही अधिकार नाही. त्यामुळे तावडे राज्यपालांना माझं तिकीट का कापलं असं विचारायला आले असावेत. राज्यपालही आधी भाजपमध्ये होते.”

“शेतकरी उद्धस्त झाला, तर सरकारही पडेल”

शेतकरी प्रश्नावर सरकारचे लक्ष्य वेधताना अजित पवार म्हणाले, “शेतकरी उद्धस्त झाला तर सरकारही पडेल. आजची परिस्थिती बिकट आहे. मुख्यमंत्री कोण होणार हाच वाद सुरू आहे. ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्याचं यांना काही देणंघेणं नाही.”

“कुणाचे पैसे यायचे तेव्हा येऊ द्या, शेतकऱ्यांना आधी मदत करा”

विमा कंपन्यांचे किंवा केंद्राचे पैसे यायचे तेव्हा येऊ द्या. मात्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी. राज्यात दीड लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी 10 हजार कोटींची तरतुद तुटपुंजी आहे. मच्छिमारांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

द्राक्षे, संत्रा, डाळिंब यांचं मोठं नुकसान झाल्यानं फळबागांना 2 लाखांपर्यंतची आणि इतर पिकांना 50 हजार रुपयांची मदत द्यावी. यासाठी 33 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी अजित पवारांनी केली. मागील काळात शेतीच करता न आल्याने शेतातील पाणी पंप बंद होते. त्यामुळे वीजबिल देखील माफ करावं, असंही मागणी त्यांनी केली.

‘दुष्काळाच्या स्थितीतही खासगी विमा कंपन्यांनी नफेखोरी’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचं मोठं संकट आहे. धानाचं पिक, सोयाबीन नष्ट झालं आहे. खरिप हंगाम वाया गेला आहे. फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने शेतकऱ्याच्या मागे उभं राहावं. मागील वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच आलं नाही. दुष्काळाचं वर्ष असतानाही खासगी विमा कंपन्यांनी नफेखोरी केली. शेतकऱ्याला काहीही मिळालं नाही. खरंतर शेतकऱ्याला मदत मिळून देण्याची जबाबदारी सरकारची आहे.”

वादळी वाऱ्याने घरे पडली आहेत, जनावरे दगावली आहेत. इतकं नुकसान झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं. खरंतर काळजीवाहू सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेणं अपेक्षित आहे. मात्र, हे काळजीवाहू सरकारच काळजी करत नसल्याचं दिसत आहे. मच्छिमारांना मागील 4 महिन्यांपासून (मान्सून सुरू झाल्यापासून) कोणतंही उत्पन्न नाही. त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. त्यांना देखील मदतीचा हात द्यायला हवा, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.