दारू पाहिजे का.. हे सहज बोलायला तुम्ही सामान्य नाहीत, मंत्री आहात!! अजितदादांकडून सत्तारांचा समाचार.. पाहा Video!

| Updated on: Nov 15, 2022 | 1:43 PM

सरकार चालवत असताना आदेश आल्यानंतर बजेट, अर्थसंकल्प, पुरवणी मागण्या अशी प्रक्रिया असते... पण वरिष्ठांनी आदेश केलेलं काम ताबडतोब झालं पाहिजे, अशा सूचना असतात. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीही तणावाखाली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय.

दारू पाहिजे का.. हे सहज बोलायला तुम्ही सामान्य नाहीत, मंत्री आहात!! अजितदादांकडून सत्तारांचा समाचार.. पाहा Video!
Image Credit source: social media
Follow us on

पुणेः मी दिवाळीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची वेगवेगळी भेट घेऊन त्यांना इशारा दिला होता. तुमच्या सरकारमध्ये वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलंय. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय, लक्ष ठेवा, असं समजावलं होतं. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तणावाखाली काम करतायत. मंत्रीपदावरील व्यक्ती काहीही बोलून नंतर मी सहज बोललो असं म्हणतायत… पण सहज बोलायला तुम्ही सामान्य नाहीत. मंत्री पदावर आहात, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारमधील मंत्र्यांची कानउघडणी केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत खा. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ झाल्याच्या प्रकरणावरून मंत्री अब्दुल सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, मी दिवाळीपूर्वीच फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतली होती. सध्या तुमच्या पक्षात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलेलं आहे. बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं तो पक्षाचा अधिकार आहे. पण ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सहकारी बोलत आहेत. त्यातून सरकारची प्रतिमा खराब व्हायला मदत होते.

अजित पवार काय म्हणाले पाहा-

लोक ऐकत, पहात असतात. लक्षात ठेवत असतात, असं सांगितलं होतं…
मंत्री काहीही वक्तव्य करतात.. चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, दूध पाहिजे का असं सामान्य लोक विचारतात. पण त्यानंतरही दारू पाहिजे का… असं विचारण्यापर्यंत मजल गेली आहे.

नंतर मी हे सहज म्हणालो, असंही बोलतात. हे सहज बोलायला तुम्ही समान्य नागरिक नाहीत. मंत्री आहात. जबाबदार आहात, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तार यांची कानउघडणी केली.

मंत्रि पदावर असताना घटना, नियम यांचा आदर करायचा असतो. अंबरनाथमध्ये दिवसा-ढवळ्या बैलगाडा शर्यतीवरून गोळीबार घडला. सरकार काय करतंय? ठाणे जिल्ह्यात किसन नगरमध्ये दोन गटात राडा झाला, पोलीस यंत्रणा राजकीय वाद सोडवण्यात बिझी झाली तर उर्वरीत कामं कोण करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला.

ते म्हणाले, देशात चांगलं प्रशासन म्हणून ओळख आहे. सरकार आल्यापासून पोलीस विभाग तणावाखाली काम करतोय. काल मी जितेंद्र आव्हाड यांना भेटायला गेलो. शहराध्यक्ष आनंद परांजपेंना भेटलो. अनेकांनी मला सांगितलं, पोलीस ऐकत नाहीत. पोलीस सांगतात, आमच्यावर प्रेशर आहे. हे महाराष्ट्राला भूषणावह नाही, असं अजित पवार म्हणाले.

मंत्रालयातील सचिव दर्जाचे, इतर कर्मचारी तणावात काम करतात. त्यांना सीएम ऑफिसमधून थेट आदेश येतात. सरकार चालवत असताना आदेश आल्यानंतर बजेट, अर्थसंकल्प, पुरवणी मागण्या अशी प्रक्रिया असते… पण वरिष्ठांनी आदेश केलेलं काम ताबडतोब झालं पाहिजे, अशा सूचना असतात. त्यामुळे प्रशासकीय अधिकारीही तणावाखाली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय.